मुंबई : राज्यातील १९४ तालुक्यांत गेल्या चार आठवडय़ांपासून पावसाने दडी मारल्याने शासकीय निकषांनुसार दुष्काळ जाहीर करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढेही पाऊस न झाल्यास ऑक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दुष्काळाचे संभाव्य संकट लक्षात घेऊन पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आणि महसूल या विभागांनी उपाययोजनांची तयारी चालू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुष्काळाचे सावट असलेले तालुके मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील आहेत. राज्यातील ३५५ पैकी १९३ तालुक्यांत १०० टक्के पाऊस झाला आहे, ५९ तालुक्यांत ७५ टक्के, ६० तालुक्यांत ५० टक्के, ३७ तालुक्यांत २५ टक्के, तर चार तालुक्यांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. १९४ तालुक्यांत ३ ते ४ आठवडय़ांचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे या तालुक्यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबतच्या चार टप्प्यांपैकी पहिला पूर्ण केला आहे. मात्र अजूनही पावसाचे दिवस दिवस शिल्लक असल्याचे, मदत व पुनवर्सन विभागातील सूत्रांनी सांगितले. कमी पाऊसमानामुळे यंदा हिरव्या चाऱ्यामध्ये ४४ टक्के तूट निर्माण शकते, हे लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याची तजवीज करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनी टंचाई आराखडे बनवले आहेत. दुष्काळ ३० ऑक्टोबरच्या आधी जाहीर करता येत नसला तरी पहिला टप्पा (ट्रीगर) पूर्ण केलेल्या तालुक्यांतील पीकस्थितीचे सर्वेक्षण लवकरच हाती घेतले जाईल, असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले. जानेवारी ते जुलै २०२३ दरम्यान राज्यात १५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्यांची नोंद अमरावती (६३७) आणि औरंगाबाद (५८४) महसूल विभागात झाली आहे. दुष्काळाच्या संभाव्य संकटामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची राज्य सरकारला भीती आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाला तोंड द्यावे लागणार असल्याने सरकारने त्यासाठी जमवाजमव सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऐन पावसाळय़ात टँकरद्वारे पाणी

राज्यात ४२१ गावे आणि १६४३ वाडय़ांना ४६८ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. यांतील सर्वाधिक १८९ टँकर्स पश्चिम महाराष्ट्रात आहेत. चाऱ्यासाठी मका आणि ऊस खरेदी यंदा मोठय़ा प्रमाणात होणार आहे. परिणामी, साखर कारखान्यांना ऊस टंचाईला तोंड द्यावे लागू शकते.

अद्याप पावसाचे दिवस शिल्लक आहेत. परिस्थिती बदलेल अशी आशा आहे. दुष्काळनिश्चिती ३० ऑक्टोबरनंतर होईल. दुष्काळाला तोंड देण्यासाठी सरकार जनतेच्या पाठीशी आहे. – अनिल पाटील, मंत्री, मदत व पुनर्वसन

काही भागांत आज मुसळधार 

पुणे : मुंबई, ठाणे, पुण्याच्या घाट परिसरासह उत्तर महाराष्ट्रात आज, शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे, विदर्भातील वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought out of 355 taluka in the state 193 talukas are drought affected in marathwada west maharashtra ysh