मुंबई : राज्य सरकार ‘व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुईंग बिझिनेस)’ धोरण राबवत असून गुंतवणूकदारांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे शासनाचे धोरण आहे आणि राज्यातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधाही उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांबरोबर भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.
फडणवीस यांनी हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट घेतली आणि राज्यातील गुंतवणूक वातावरण, पायाभूत सुविधा आणि विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याबरोबर उद्योगपती, गुंतवणूकदार, व्यापार क्षेत्रातील शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले आहे.
ज्याप्रमाणे लंडन ही ब्रिटनची ओळख आहे, त्याचप्रमाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भारत अशी ओळख असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, व्यवसाय सुलभता धोरणामुळे उद्योग परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन केली असून दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो. राज्यात उद्योग, वित्त, शिक्षण, नगरविकास आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
देशाच्या शिक्षण क्षेत्रात नवे धोरण राबविले असून परदेशी विद्यापीठांसाठी प्रवेशद्वार खुले केले आहे. त्या अंतर्गत राज्यात नवी मुंबई येथे ‘एज्यु सिटी’ उभारण्यात येत आहे. तेथे लंडन विद्यापीठही असेल. येथे दोन हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ, सी-लिंक आणि ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात आधुनिक शहरी विकास होत आहे. वाढवण बंदर विकसित केले जात असून याठिकाणी बुलेट ट्रेन स्थानक आणि ग्रीन इंडस्ट्रियल झोनच्या माध्यमातून हा परिसर ‘चौथी मुंबई’ म्हणून विकसित होत आहे.
छत्रपती संभाजीनगर हे विद्युतवाहनांचे हब, नागपूर सौर मॉड्युल उत्पादन केंद्र, तर पुणे हे उद्योगांचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्र देशातील स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीत आघाडीवर आहे. पायाभूत सुविधा विकासामुळे भारत आज गुंतवणूक स्नेही देश बनला असून प्रशासनात पारदर्शकता वाढत आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांनीही (स्ट्रीट व्हेंडर्स) डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत. जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जाते. त्याचबरोबर २०३० पर्यंत ५० टक्के पुनर्वापर ऊर्जा वापराचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे.
राज्यात डेटा सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी पुण्यात विशेष व्यवस्था उभारली जात आहे. स्किल विद्यापीठांमार्फत एचपी सारख्या आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर तज्ञ घडविण्याचे काम सुरू आहे. फिनटेक आणि वित्तीय कंपन्यांचे माहेरघर म्हणजे मुंबई आहे. ब्रिटन आणि भारतातील भागीदारी आणखी दृढ व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ब्रिटिश शिष्टमंडळातील सदस्यांनी एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली.