मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडल्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी हाती घेण्यात आलेले प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू असून, त्याला जबाबदार कोण, तसेच हे प्रकल्प कोणामुळे रखडले? अशी विचाराणा करीत पालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपच्या मंत्र्यांनी केल्याचे समजते. दुसरीकडे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत मुंबईची दैना होण्यास त्यांना जबाबदार धरले. तर ठाकरे यांना मुंबईबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर माजी मंत्री नारायण राणे यांनी दिले.
मुंबईत सोमवारी मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. मुंबईकरांना दिवसभर त्रास सहन करावा लागल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. त्यात सत्ताधाऱ्यांनी मुंबईत पाणी तुंबण्यास पूर्वीचे महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा प्रत्यारोप सुरू केला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत आशीष शेलार यांनी मुंबईच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. ‘सोमवारच्या घटनेवरून सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र ही जबाबदारी महापालिकेची आहे. शहरामध्ये पावसाळ्यात पाण्याचा वेळीच निचरा व्हावा यासाठी हजारो कोटी रुपयेे खर्चून ‘ब्रिमस्टोवॅड’ प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. मिठी नदीतील गाळ काढण्याचे कामही अपूर्ण असून त्यातील गाळ काढण्याच्या कामात मोठा घोटाळा झाला आहे. याची चौकशी सुरू असून अजूनही आरोपींवर कारवाई नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहरातील अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आल्यामुळे कामे रखडली. एकूणच सोमवारच्या घटनेला पालिकेवर वर्षानुवर्षे सत्ता असलेली शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा ठपका शेलार यांनी ठेवल्याचे समजते. शहरातील प्रकल्पांचे नेमके काय चालले आहे, कोणामुळे कामे रखडली, याची सर्व माहिती मुंबईकरांना मिळायला हवी. त्यासाठी पालिकेची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच पावसाळयात झाडांच्या फांद्या पडून अनेकांचा जीव जातो. अशा दुर्घटना टाळण्यासाठी खाजगी जागेतील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठीचे शुल्क पालिकेने माफ करावे. त्यामुळे लोक स्वतः झाडांच्या फाद्या तोडतील. तसेच दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक दरडींना संरक्षक जाळया लावण्याचे काम म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते. मात्र यासाठी पालिकेने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणीही शेलार यांनी बैठकीत केल्याचे समजते.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत
- राज्यात यंदा अंदाजापेक्षा १५ दिवस आधीच पावसाचे आगमन झाले. त्यात सोमवारी दक्षिण मुंबईत एका तासात २०० मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे शहरात पाणी साचले. तसेच राज्यात अतिवृष्टीत आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात येणार आहे.
- राज्यात चांगला पाऊस होत असला तरी आजमितीस १,४५० टँकरच्या माध्यमातून विविध गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू असून त्यातील ६४७ टँकर एकट्या छत्रपती संभाजी नगरात सुरू असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यता आली.
आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी
मुंबईकरांना नुकसानभरपाई द्या : आदित्य ठाकरे</p>
मुंबईत पावसानंतर जो गोंधळ निर्माण झाला तो पावसामुळे नव्हे तर ते सरकार आणि मुंबई महापालिकेचे अपयश आहे. मुंबई पालिका गेल्या ३ वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयातून, नगरविकास खात्यातून चालते, हे अपयश त्यांचेच आहेत. दोन-तीन वर्षांपासून हा भ्रष्टाचार सुरू असून मुंबई तुंबली त्याला ‘भ्रष्टनाथ’ शिंदे आणि मुंबई महापालिका जबाबदार असल्याची टीका करताना मुंबईकरांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना (आमदार) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
ठाकरेंच्या राशीत मदत शब्द आहे का? : राणे
मुंबईत झालेल्या पावसानंतर सरकारला आणि लोकांना मदत करायची सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाने ठाकरे खडे फोडत आहेत. दुसऱ्यांवर टीका करणाऱ्या ठाकरेंनी आतापर्यंत बुडालेल्या लोकांना किती मदत केली. उद्धव ठाकरेंच्या राशीत मदत शब्द आहे तरी का? असा पलटवार भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये. शिंदे बिचारे काही बोलत नाहीत. परंतु, माझ्याकडे १९८५ पासूनचा हिशेब आहेत. आम्हाला बोलायला लावू नका, आदित्य ठाकरे यांनी मोदी, शहा, फडणवीस यांच्याविषयी बोलू नये, असा सूचक इशारा राणे यांनी दिला.