मुंबई : मुंबई उपनगरीय लोकल प्रवास जीवघेणा झाला आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये धावत्या गाड्यांमधून पडून २३४७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उपनगरीय गाड्यांतून प्रवास करताना दररोज प्रवाशांचा मृत्यू होत आहे. तर, अनेक प्रवासी जखमी होत आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळी नोकरदार कार्यालयात जाण्यासाठी प्रचंड गडबडीत असतात. तसेच लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने, प्रवाशांना इच्छित लोकल वेळेत पकडता येत नाही. त्यामुळे एका लोकलमध्ये गर्दी वाढते. त्यामुळे प्रवाशांचा धावत्या लोकलच्या दरवाजातून पडणे, बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसणे अशा घटना घडत आहेत. तर, प्रवासी शाॅर्टकटचा वापर करत रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे देखील प्रवाशांचा मृत्यू होतो. गेल्या पाच वर्षात विविध कारणांमुळे १० हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, यामधील धावत्या लोकलमधून पडून २,३४७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकल प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागला आहे.
मुंबईतील प्रलंबित रेल्वे प्रकल्प, परप्रांतीयांचे वाढलेले लोंढे, विस्कळीत झालेले रेल्वे वेळापत्रक, जलद लोकलला अनावश्यकपणे दिलेले वाढीव थांबे, वातानुकूलित लोकलच्या वाढलेल्या फेऱ्या अशा अनेक कारणामुळे लोकलवर गर्दीचा भार वाढला आहे. परिणामी, मुंब्रा येथील लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. २०२१ जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण १० हजार २३९ प्रवाशांचा रेल्वे प्रवासात मृत्यू झाला. त्यात रेल्वे रूळ ओलांडताना मध्य रेल्वेवरील ३,१५१ आणि पश्चिम रेल्वेवरील १,९७० प्रवाशांचा मृत्यू झाला. मध्य रेल्वे मार्गावर लोकलमधून पडून १,६६७ प्रवासी आणि पश्चिम रेल्वेवर लोकलमधून पडून ६८० प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
मुंबई ते कसारा, आसनगाव, कर्जत, खोपोली, वसई, विरारपर्यंत गृहप्रकल्पे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. स्वस्तात घरे मिळत असल्याने, अनेकांनी मुंबई महानगरात संसार थाटले आहेत. गृहप्रकल्प झपाट्याने वाढलेली असताना, वाहतूक सेवेचा विकास तुलनेने कमी झाला. त्यामुळे मर्यादित लोकल फेऱ्यांवर लाखोंच्या संख्येने प्रवाशांचा ताण वाढला. परिणामी, प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. त्यामुळे गर्दीमय लोकलला लटकून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
रेल्वेला कोटयवधींचे आर्थिक उत्पन्न देणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार अद्याप सुरुच आहे. मुंबई महानगरातील रखडलेली रेल्वे प्रकल्प पूर्ण केल्यास, मार्गिका वाढविल्यास लोकल सेवेवरील ताण कमी होईल, असे मत रेल्वे प्रवासी प्रवासी संघटनेने व्यक्त केले.
अपघात | मध्य रेल्वे | पश्चिम रेल्वे |
रूळ ओलांडताना होणारे मृत्यू | ३,१५१ | १,९७० |
धावत्या गाडीतून पडून मृत्यू | १,६६७ | ६८० |
रेल्वे खांब लागून मृत्यू | १८ | ११ |
फलाट, लोकलच्या गॅपमुळे मृत्यू | २७ | ०४ |
विद्युत तारेशी संपर्क आल्याने मृत्यू | २२ | १४ |
नैसर्गिक मृत्यू | १२४० | ८३० |
आत्महत्या | ३१४ | १३६ |
इतर | ५१ | ४४ |
मृत्यूचे कारण अस्पष्ट | ५० | १० |
( जानेवारी २०२१ ते मे २०२५ मेपर्यंत) स्त्रोत – लोहमार्ग पोलीस