मुंबई : सत्तेच्या नादी लागून अनेकजण सत्ताधारी महायुतीत गेले, पण भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे आता ते कपाळावर हात लावून बसलेत. हे लोक मतांची चोरी करून सत्तेत बसले आहेत. ती चोरी आता पकडली गेली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

वांद्र येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ व मुंबईतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली. या वेळी त्यांनी दिल्लीत ‘इंडिया आघाडी’ने केलेल्या आंदोलनाचा दाखला दिला.

‘कालचा दिवस देशाच्या व महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता. आपण सर्वजण देशात जे काही सुरू आहे ते पाहत आहोत. महाराष्ट्रात बेबंदशाही असल्यासारखा भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. कारण, भ्रष्टाचार केल्याने कुणाला काहीच फरक पडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे’, अशी टीका त्यांनी केली.

‘हे लोक मतांची चोरी करून सत्तेत बसले आहेत. ती चोरी आता पकडली गेली आहे. याविषयी ३०० खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन जाब विचारणार होते. पण त्यांना जाऊ देण्यात आले नाही. विरोधी पक्षाच्या खासदारांना अटक करण्यात आली. पण आता एकेक करून आपल्या डोळ्यांवरच्या पट्ट्या निघत आहे. आता यांची सत्ता जाण्याची वेळ आली आहे. यांची नाटके लोकांनी ओळखली आहेत,’ असे ठाकरे म्हणाले.

‘न्यायहक्कासाठी आपण लढत राहू’

दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी दिल्लीला जात होते. पण केंद्र सरकारने त्यांच्या मार्गात खिळे रोवले. मोठे लोखंडी अडथळे उभे केले. जे खासदार जनतेने निवडून दिले आहेत, त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत. आपण जर पुराव्यानिशी त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगला तरी त्या मंत्र्यांवर कारवाई करायची नाही. त्यामुळे आपण आणखी किती दिवस हे सहन करायचे? असा संताप व्यक्त करत जनतेच्या न्यायहक्कासाठी आपण लढत राहू हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.