संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यांदरम्यान मोदींनी त्या त्या राष्ट्रप्रमुखांशी विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली. तसेच, द्वीपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भातही यावेळी बोलणी झाली. त्यानंतर मायदेशी परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते मुंबईत जवळपास २९ हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. विरोधकांच्या टीका-टिप्पणीमुळे मोदींचा हा मुंबई दौरा चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात विघानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुका व शुक्रवारी विधिमंडळात पार पडलेली ११ जागांसाठीची विधानपरिषद निवडणूक या निकालांच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष वगळता विरोधी पक्षांमधून बंडखोरी केलेले दोन पक्ष आहेत. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विशेष राजकीय घडामोडींची ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींच्या हस्ते एकूण २९ हजार ४०० कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. गोरेगावमधील NESCO Exhibition Centre मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

कोणत्या विकासकामांची उद्घाटनं होणार?

१. MMRDA चा ठाणे-बोरिवली लिंक रोड प्रकल्प (ट्विन टनेल)
२. मुंबई महानगर पालिकेचा गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (ट्विन टनेल)
३. मध्य रेल्वेचं कल्याण यार्ड रीमॉडेलिंग
४. नवी मुंबईतील तुर्भे येथील गतीशक्ती मल्टिमॉडेल कार्गो टर्मिनल
५. लोकमान्य टिळक टर्मिनसमधील नवीन प्लॅटफॉर्म
६. सीएसटी स्थानकावरील १० व ११ क्रमांकाचे प्लॅटफॉर्म

१६६०० कोटींचा ठाणे-बोरीवली ट्विन टनेल

एमएमआरडीएनं दिलेल्या माहितीनुसार, यातील ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्प तब्बल १६ हजार ६०० कोटींचा असून त्यात संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणाऱ्या ट्विन ट्यूब टनेलचाही समावेश आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरीवली व ठाणे-घोडबंदर रोड ही ठिकाणं जोडली जाणार आहेत. एकूण ११.८ किलोमीटर लांबीचा हा मार्ग ठाणे ते बोरीवलीदरम्यानचा प्रवास जवळपास १२ किलोमीटरने कमी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासासाठी लागणारा वेळ वाचू शकतो.

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाच्या खर्चात पाच हजार कोटींनी वाढ

गोरेगाव-मुलुंड ट्विन टनेल

दरम्यान, ठाणे-बोरीवली ट्विन टनेलप्रमाणेच गोरेगाव-मुलुंड ट्विन टनेलही पूर्व व पश्चिम महामार्गांना जोडणार आहे. ६ हजार ३०० कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा हा लिंक रोड गोरेगाव ते मुलुंड असा असेल. त्यामुळे या दोन ठिकाणी प्रवासाचा वेळ २५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रवासासाठी जवळपास दीड तास लागतो.

कल्याणमधील रीमॉडेलिंगचा फायदा काय?

कल्याणमधील यार्ड रीमॉडेलिंगमुळे उपनगरीय रेल्वेगाड्या आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या यांची वाहतूक अधिक सुरळीत होऊ शकेल. यामुळे गाड्यांचा वक्तशीरपणा आणि कार्यक्षमता अधिक वाढू शकेल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi to inaugurate lay foundation stone of development work in mumbai visit pmw