मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे भाऊ महाराष्ट्र हितासाठी टाळी देणार अशी चर्चा सुरू झाली असताना या दोन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे.
महाराष्ट्रद्रोही कोण हे जर राज ठाकरे यांना कळणार नसेल, तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करावा लागेल, असा टोला ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जुना वाद उकरून काढत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मनसे कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या १७ हजार गुन्ह्यांबद्दल उद्धव ठाकरे माफी मागणार का, असा सवाल केला आहे.
महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणे क्षुल्लक आहेत, असे सांगून राज ठाकरे यांनी दोन्ही भाऊ एकत्र येण्यास हरकत नसल्याचे सूतोवाच केले. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देताना भाजप किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तडजोडी चालणार नाहीत, अशी अटही घातली होती.
वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची भाषा दोन भाऊ करीत असताना त्यांचे नेते मात्र एकमेकांमध्ये भांडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, दोन नेत्यांच्या एकीकरणावर दुसऱ्या फळीतील नेते टिप्पणी करून वातावरण कलुषित करीत असल्याचे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रद्रोही कोण आहेत हे राज ठाकरे यांना चांगले माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे यांनी महाराष्ट्र तोडला आहे. अशा नेत्यांबरोबर राहून महाराष्ट्र हिताची चर्चा होऊ शकत नाही.- संजय राऊत, खासदार, शिवसेना
© The Indian Express (P) Ltd