Mumbra Thane Train Accident : ठाण्यापासून ते कर्जत कसारापर्यंतच्या पट्ट्यातले लोक दिवसाचे अक्षरश: ४-४ तास लोकल प्रवासात खर्च करतात ते भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये नोकरी करण्यासाठी. मुंबईची लोकल ही तिची लाइफलाइन किंवा जीवनवाहिनी मानली जाते परंतु, हीच मुंबईच्या परीघाबाहेरील प्रवाशांची मृत्यूवाहिनी आहे हे वारंवार दिसून आलंय आणि सरकारला तुमच्या जीवाची यत्किंचितही पर्वा नाही हे ही वारंवार निदर्शनास आलंय. परंतु, ‘मुंबई स्पिरिट’ला जागत खरंतर ईएमआय भरायचा असल्यानं असं स्पिरीट दाखवण्याखेरीज या महामुंबईकराला दुसरा काही पर्यायच नाहीये. कितीही जणांनी प्राण गमावला तरी पुन्हा लोकलला लोंबकळत प्रवास करत ते स्पिरीट रोज दाखवावंच लागतं.
गेल्या २० वर्षांमध्ये मुंबईच्या लोकलमधून पडून तब्बल ५१ हजारांहून अधिक महामुंबईकरांनी जीव गमावलाय, गेल्या वर्षभरातच सुमारे अडीच हजारांनी आपला जीव गमावलाय. यामध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. उठल्या बसल्या बहिणीला लाडकं म्हणणाऱ्या सरकारमधल्या उच्चपदस्थांच्या मनात महिलांचं स्थान काय आहे हे बघायचं असेल तर फक्त एकदा सकाळी ८ ते १० च्या सुमारास कल्याण, डोंबिवली ते कळवा या स्थानकांदरम्यान महिलांच्या डब्यांकडे नजर टाकावी. एका क्षणात सरकारच्या लेखी महिलांचं काय स्थान आहे ते दिसून येईल.. तीच गत बाजुच्याच डब्यात लटकणाऱ्या लाडक्या भावांची.
हे रोज कसं होत नाही याचं आश्चर्य वाटतं
काहीही करून ऑफिसला पोहोचायच्या मजबुरीत लोकलला लटकलेले ५ जण मुंब्र्याजवळ पडून गतप्राण झाले आणि काही जण गंभीर जखमी झाले. खरंतर हे रोज कसं होत नाही याचं आश्चर्य वाटावं आणि या एकाच कारणामुळे जगात देव असावा यावर विश्वास बसावा अशी परिस्थिती आहे. रेल्वेमंत्री असोत वा स्थानिक आमदार, खासदार अशा घटना घडल्या की नक्राश्रू ढाळणार नी लवकरच कशी परिस्थिती सुधारेल याची आश्वासनं देणार पण वास्तवात स्थिती काय आहे?
अन् एसी गाड्यांनी तुमच्या मरण्याची शक्यता आणखी वाढवली
मुंबईत १५ डब्यांच्या गाड्या वाढल्या तर थेट प्रत्येक गाडीमागे २५ टक्के प्रवासीक्षमता वाढते आणि गर्दीचा भार कमी होतो, परंतु, गेल्या अनेक वर्षांमध्ये मध्य रेल्वेवर एकही १५ डब्यांची गाडी वाढवलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. एसी लोकलनी ज्यांना परवडतं त्यांचा प्रवास सुखाचा केला खरा, पण त्यातली मेख अशी की आधीच्या साध्या गाड्यांच्या जागी एसी गाड्या आल्या. नव्या नाही आल्या. म्हणजे, सामान्य गाड्यांवरचा बोजा आणखी वाढला. तुमच्या मरण्याची शक्यता आणखी वाढली.
मुंबई हे रात्रभर जागं राहणारं शहर आहे असं म्हणतात. त्यामुळे कॉमन सेन्स काय सांगतो की जशी वर्षे सरकतील त्याप्रमाणे रात्रीच्या शेवटच्या गाडीची वेळही लांबत जाईल. प्रत्यक्षात काय आहे, तर मुंबई सीएसएमटीवरून सुटणारी शेवटची गाडी पाऊणच्या सुमारास होती ती आत्ता सव्वा बारावर आणलीय. म्हणजे वेळ लांबवणं दूर राहिलं उलट शेवटची गाडी अर्धा तास आधीच सुटते. कधीही न झोपणारं शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईमध्ये तुम्ही कारणानं सव्वा बाराच्या पुढे थांबलात तर तुमच्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे दीड दोन हजार भरून ओला किंवा उबर करून घरी जा. किंवा दुसरा पर्याय म्हणजे प्लॅटफॉर्मवरचे कुत्रे चावणार नाहीत ना, भिकारी त्रास देणार नाहीत ना याची विवंचना करत सीएसएमटी किंवा तत्सम रेल्वे स्थानकाच्या फलाटावर डुलक्या घेत पहिल्या गाडीची वाट बघा.
काही वर्षांपूर्वी बदलापूरवासियांनी सामान्य गाडी एसी केली म्हणून आंदोलन केलं. दिवावासियांनी गाडीत चढायला मिळत नाही म्हणून आंदोलन केलं. झालं काय, तात्पुरती आश्वासनं देऊन फुटकळ असं काही पदरात देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसली.
रेल्वेचा न्याय उफराटा
मध्य रेल्वेवर एकही गाडी वेळेवर निघत नाही, तसेच एकही गाडी वेळेवर आपल्या गंतव्य स्थानी पोहोचत नाही, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या आल्या की लोकल मागे ठेवून त्यांना पुढे सरकवलं जातं. आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून काही कोण रोज प्रवास करत नाही, त्यामुळे त्यांना उशीर झाला तर चालण्यासारखं आहे, उलट चाकरमानी रोज प्रवास करतो. तर त्याला प्राधान्य द्यायला हवं. पण रेल्वेचा न्याय उफराटा आहे, जो रोज प्रवास करतो त्याला लटकवायचं नी जे क्वचित प्रवास करतात त्यांना पुढे सोडायचं. हा उद्दामपणा रेल्वे प्रशासनाकडे आणि सरकारकडे आहे कारण त्यांना माहिती आहे ती या महामुंबईकराचं स्पिरीट एकदम जोरदार आहे. कितीही त्रास झाला, हाल झाले, अपेष्टा भोगाव्या लागल्या; पुढचा किंवा मागचा माणूस पडून मेला तरी तो गपगुमान उद्या परत येणारच आहे, कारण त्याला किंवा तिला ईएमआय भरायचा आहे, महामुंबईच्या स्पिरीटला जागायचंय.
“राज्यकर्त्यांना माहितीय आपण सगळे मुंबई स्पिरीटशी इमान राखत लोकलमधून पडून मरणार आहोत”
जुन्या काळी राजे महाराजांमध्ये दोन गोष्टींबाबत एकवाक्यता होती.. एक म्हणजे आपल्याविरोधात उठाव होऊ नये असं वाटत असेल तर लोकांना विविध मुद्यांवरून आपसात लढवायचं नी आपण मजा बघायची. दुसरं म्हणजे खरोखरच कोंबड्यांच्या लावतात तशा झुंजी लावायच्या आणि कोण कुणाचा कसा जीव घेतोय ते मजेत बघायचं. त्याला ग्लॅडिएटर असं म्हणतात. सध्या काही वेगळं नाहीये. गाडीत चढता येत नाही म्हणून लोक उलट दिशेने प्रवास करतात. म्हणजे डोंबिवलीवाले कल्याणच्या दिशेने, कल्याणवाले अंबरनाथच्या दिशेने आणि अंबरनाथवाले बदलापूरच्या दिशेने. म्हणजे जिथून गाडी सुटणार आहे ती आधीच भरून येते. मग या लोकांच्या हाणामाऱ्या. राज्यकर्त्यांना अशा झुंजी बघायला आवडतात कारण त्यांना माहिती असतं हे गाडीत आपसात भांडणारे, मारामाऱ्या करणारे शेवटी स्पिरीटशी इमान राखत रोज कणाकणाने किंवा एकदा पडून मरणार आहेत. तसेच जिवंत आहेत तोपर्यंत ‘सब घोडे बारा टक्के’ असलेल्या आपल्यापैकीच कुणाला तरी मत देणार आहेत.
तर, ज्याअर्थी तुम्ही हे वाचताय त्याअर्थी अजून तरी तुम्ही जिवंत आहात, लोकलमधून पडून मयत नाही झालायत. जिवंत आहात तोपर्यंत जीवाला जपा, जीवापेक्षा नोकरी-धंदा महत्त्वाचा नसतो. ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे लक्षात ठेवा. पण रोज लोकल तर पकडावी लागणारंच आहे. त्यालोकलमध्ये किमान मानानं प्रवेश करता यावा, लोकलला लटकायची वेळ येऊ नये यासाठी सरकारला जाब विचारा. दुसरा कुठला नाही पण मतदानाचा एक्का तर तुमच्या हातात आहे. त्याचा योग्य वापर करा!
© IE Online Media Services (P) Ltd