मुंबई : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. साधारणपणे १५ ते १६ जून दरम्यान मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापतात. यंदा अंदाजित वेळेनुसारच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून, पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

साधारणपणे १६ जून रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापतात. यंदा अंदाजित वेळेतच म्हणजे १७ जून रोजी मोसमी वाऱ्यांनी सर्व महाराष्ट्र व्यापला आहे. १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा लवकर २४ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर २५ मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला. लगेच दुसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्यांनी आगेकूच सुरू केली. मुंबईसह, पुणे आणि इतर काही भागात २६ मेपासून धडक दिली आणि १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.त्यानंतर मात्र, मोसमी वाऱ्यांचा प्रवास मंदावला होता.

मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली होती. तब्बल २० दिवसांनंतर सोमवारी मोसमी वाऱ्यांनी वाटचाल केली. मोसमी पावसाने सोमवारी ,१६ जून रोजी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापला असून विदर्भाच्या काही भागात प्रगती केली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी मोसमी वाऱ्यांनी विदर्भाच्या उर्वरित भागांसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.

मोसमी वाऱ्यांची सीमा दीसा, इंदूर, पचमढी, मांडला, अंबिकापूर, हजारीबाग, सुपौल येथून जात आहे. पुढील ४८ तासांत मोसमी वाऱ्यांची आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर बंगालचा उपसागर आणि गुजरातवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. पुढील ५ दिवस कोकण आणि घाट वगळता राज्यात इतरत्र मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.

यंदा केरळमध्ये वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. अंदाजित वेळेपेक्षा ८ दिवस अगोदर आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे लवकर दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तळकोकणात मोसमी पावसाचे आगमन झाले आणि लगेचच सोमवारी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. यंदा १५ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. सामान्यतः मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होते.

मोसमी पाऊस दाखल म्हणजे काय ?

भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो. साधारण मे महिन्यापासूनच राज्यात पाऊस हजेरी लावतो. मात्र तो मोसमी पाऊस नाही. मोसमी पावसाची सुरुवात झाली किंवा मान्सून सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते.

यंदा सरासरीपेक्षा जास्त

संपूर्ण मोसमी पावसाच्या काळात एल निनो सक्रिय होण्याची स्थिती नाही. हिंदी महासागरीय द्विध्रुविताही तटस्थ आहे. डिसेंबर – मार्च या काळात युरोशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.