नागपूर : मराठवाड्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी , अशी मागणी करण्यात येते आहे, असे असताना अर्थमंत्री अजित पवार भडकले म्हणाले पैशाचे सोंग आणता येत नाही, तिजोरीची अवस्था आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करू देणार का सरकार, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
मराठवाडा येथील अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहे पण हा केवळ देखावा आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी विचारलं किती मदत देणार सांगावे तर ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेल आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवा बनवी सरकार करत आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.
अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीची मागणी केल्यावर ते का भडकतात? एक वर्षाआधी निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू ही घोषणा याच पक्षांनी केली होती ना? आता पैशाचे सोंग आणता येत नाही ही कारणे का देत आहेत? लाडक्या बहिणींचे कारण सरकार देत आहे मग ती योजना पण मत मिळवण्यासाठी होती ना? शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, सोयाबीनवर किड आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसे मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पीक गेले नाही तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे. यासाठी सहा महिन्याचा आमदार निधी मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपला आमदार निधी द्यावा असे आवाहन वडेट्टीवर यांनी यावेळी केले.
भाजप सह सत्तेतील इतर घटक पक्षाचे आमदार एक महिन्याचा आमदार वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत तर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व विधिमंडळ पक्षनेते वडेट्टीवार यांनी सहा महिन्याचा आमदार वेतन घेणार असल्याचे आज इथे माध्यम प्रतिनिधींना सांगितले.