नागपूर : करोना आजाराबाबत आजही चीन या देशाकडे संपूर्ण जग संशयाच्या नरजेने बघत आहे. त्यातच नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे शनिवारी झालेल्या हॅलो डायबेटिज ॲकेडमिया या मधूमेहावरील परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत व चीन या दोन्ही देशातील एका आजाराबाबत महत्वाचे भाष्य केले. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, भारत मधूमेहाची राजधानी होऊ बघत आहे. येथे लठ्ठपणा व मधूमेहाचे रुग्ण वाढत आहे. सध्या भारत आणि चीन या दोन देशात मधूमेह रुग्ण संख्या बघता या आजाराच्या रुग्ण वाढीची स्पर्धा दिसत आहे. हे चुकीची असून ही स्पर्धा इतर गोष्टीत हवी. पूर्वीच्या तुलनेत आता खानपान व जिवनशैलीतील बदल, व्यायामाचा अभावासह इतर कारणांनी वाढते आजार बघत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियासह इतरही चांगले उपक्रम हाती घेतले. परंतु आताही या उपक्रमात मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे.

मधूमेह हा व्यक्तीला पोखरणारा आजार आहे. योग्य काळजी न घेतल्यास मधूमेहग्रस्तांना बऱ्याच गंभीर सहआजाराचा धोका वाढतो. नागपुरातील मधूमेह तज्ज्ञांच्या जागतिक परिषदेत नवनवीन संशोधन, उपचाराची पद्धतीसह नावीन्यपूर्ण उपक्रमावर चर्चा होणार आहे. येथे गर्भधारणा झालेल्या महिलेची तेव्हापासून योग्य काळजी घेतल्यास भविष्यात तिच्या होणाऱ्या मुलाला मधूमेहाचा धोका टाळण्याबाबतही चांगले काम होत आहे. या पद्धतीने आपण प्रत्येकाने काळजी घेतल्यास नवीन पिढी मधूमेहापासून वाचवणे शक्य असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. परिषदेला प्रामुख्याने मंचावर डॉ. बंसी साबू, डॉ. कमलाकर त्रिपाठी, डॉ. शशांक जोशी, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. कविता गुप्ता, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी, डॉ. ए. के. दास, डॉ. राती मक्कर हे देश- विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

६० टक्के रुग्ण नकारात्मक भूमिकेत

भारतात आजही मधूमेहाचे ६० टक्के रुग्ण आम्हाला हा आजार होऊ शकत नाही, होणार नाही अशा नकारात्मक भूमिकेत दिसतात. हे चुकीचे आहे. मधूमेहावर योग्य उपचार व आवश्यक काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात राहू शकतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मधुमेह व लठ्ठपणावर नियंत्रण शक्य- डॉ. गुप्ता

पोटातील चरबी, शरीर, लठ्ठपणामुळे २०० हून जास्त आजार होतात. पश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात मधुमेहाचे रुग्ण जास्त वेगाने वाढत आहेत. त्यामुळेच भारतात रक्तदाब, ह्रदयविकारासह इतरही अनेक गंभीर आजार वाढत आहेत. मधूमेह, रक्तदाबाचा धोका जिवनशैलीतील बदल, योग्य औषधोपचारासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार वागल्यास मधुमेह, लठ्ठपणावर नियंत्रण शक्य आहे, असे मत मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी व्यक्त केले.