अमरावती : गेल्या काही दिवसांत पश्चिम विदर्भात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांमधील जलसाठा वाढला असून चार मोठ्या प्रकल्पांसह एकूण २३ सिंचन प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात येत आहे. शुक्रवारी विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची पाच दारे २० सेंटीमीटरने उघडण्यात आली. या धरणामधून १६.०५ क्यूमेक विसर्ग सुरू आहे. वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
अमरावती विभागातील एकूण ९ मोठ्या प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पाची दारे ३१ सेंटिमीटरने उघडण्यात आली असून ८०.१० क्यूमेक विसर्ग सुरू आहे. बेंबळा प्रकल्पाची २ दारे १० सेंमी उघडण्यात आली आहेत. १६ क्यूमेक विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाची दारे बंद करण्यात आली आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाच्या ३ दारांमधून २०४.६९ क्यूमेक विसर्ग सुरू आहे.
एकूण २७ मध्यम प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, मोर्णा, घुंगशी बॅरेज, वाशीम जिल्ह्यातील अडाण, सोनल, एकबुर्जी, ज्ञानगंगा, बुलढाणा जिल्ह्यातील कोराडी, मन आणि उतावळी या प्रकल्पांमधून सध्या पाणी सोडण्यात येत आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पाचा जलसाठा ९२.६७ टक्के इतका झाला आहे. या धरणाची तीन दारे काल उघडण्यात आली. आज आणखी दोन दारे उघडण्यात आली.पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ११७०.७३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८३.६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ६१४.८० दलघमी म्हणजे ७९.६७ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये ७१७.३२ दलघमी म्हणजे ७७.०७ टक्के जलसाठा झाला आहे.
विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये २५०२ दलघमी (८०.६७ टक्के) पाणीसाठा झाला आहे.विभागातील अनेक मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचे पाणलोट क्षेत्र हे मध्य प्रदेशच्या सीमेवर आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस सुरू आहे. विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पांसह इतर सर्व प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात चांगली वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.९० टक्के आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ७६.१८ टक्के जलसाठा झाला होता.धरणांमध्ये आगामी काळात येवा वाढेल हा अंदाज घेत खबरदारीचा उपाय म्हणून अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. काही धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.