नाशिक – समता प्रतिष्ठान ही संस्था २५ वर्षांपासून चालवत असलेल्या मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयातील आणि बहुउद्देशीय दिव्यांग निवासी कार्यशाळेतील मुलांना शिक्षण- प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष आशिष नहार यांनी
दिले.

समाजातील अपंग मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी समता प्रतिष्ठान संस्थेने येवला येथे सुरू केलेल्या बहुउद्देशीय दिव्यांग निवासी संमिश्र कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आशिष नहार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी निमाचे उपाध्यक्ष आणि येवल्याचे भूमिपुत्र, प्रसिद्ध उद्योजक किशोर राठी हे होते.

सुरुवातीला आशिष नहार यांच्यासह उपस्थितांच्या हस्ते बहुउद्देशीय दिव्यांग निवासी संमिश्र कार्यशाळेच्या पैठणी विणकाम, संगणक, शिवणकाम,खादी निर्मिती आणि फेब्रिकेशन या व्यावसायिक प्रशिक्षण विभागाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नहार यांनी मनोगत व्यक्त केले. मूकबधिर असूनही मुलांनी आमच्यासमोर जे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ते पाहून आश्चर्यचकित झालो आहे. हे निखळ मानवतावादी काम आहे.

संस्था आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमाला यानिमित्ताने साष्टांग नमस्कार करतो. या कामाच्या पाठीमागे उभे राहणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, या ‌शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त खास बसवलेल्या दिव्यांग सांस्कृतिक कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाला निमाच्या सर्व उद्योजकांतर्फे आवश्यक ते अर्थसाह्य करण्याबरोबरच या मुलांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठीही निमातर्फे हातभार लावला जाईल. निमाचे १६ हजारपेक्षा जास्त उद्योजक प्रतिनिधित्व करतात. चार मोठे प्रकल्प नाशिकमध्ये लवकरच सुरू होत आहेत. या उद्योजकांकडून मायबोलीतील विशेष मुलांच्या पुनर्वसनासाठी सीएसआर फंडातून देखील निधी मिळवून देण्यासाठी मी व्यक्तीश: प्रयत्न करीन,असे नहार यांनी आश्वासित केले.

निफाड येथील न्यायमूर्ती रानडे शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्राचार्य वि. दा. व्यवहारे यांनी,आयुष्यात उभे राहण्यासाठी धडपडत असलेल्या अपंग मुलांचा आपण आधार झाले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. तब्बल पंचवीस वर्षे अशा प्रकारचे काम करीत राहणे ही दिसते तेवढी सोपी गोष्ट नाही, म्हणून निफाडकरांच्या वतीने या मुलांच्या अपंग सांस्कृतिक कलाविष्काराचे किमान तीन कार्यक्रम निफाड तालुक्यात होतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु, त्याचबरोबर या शाळेसाठी एक हात मदतीचा हा जो लोकसहभाग घेणारा उपक्रम आहे, त्यातही आमची संस्था मागे राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर राठी यांनी, मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालय हे आम्हा येवलेकरांचे भूषण असल्याचे सांगितले. निखळ मानवतावादी दृष्टिकोनातून या शाळेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण या शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे त्यांनी नमूद केले. समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी २५ वर्षाचा अहवाल सादर करून केवळ लोकाश्रयावर हा दिव्यांग पुनर्वसन प्रकल्प कसा सुरू आहे, हे कथन केले. या कार्यशाळा उद्घाटन समारंभास निमाचे खजिनदार राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, ज्येष्ठ संचालक गोविंदराव बोरसे,चंदन जैन तसेच निफाड येथील विश्वासराव कराड, मधुकर राऊत आणि येवल्याचे उद्योजक सुशीलभाई गुजराती व्यासपीठावर उपस्थित होते. बहुउद्देशीय दिव्यांग निवासी संमिश्र कार्यशाळेचे व्यवस्थापक सुजित बारे, कुणाल चव्हाण, कुणाल कोकाटे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. बाबासाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस दिनकर दाणे यांनी आभार मानले.