पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शहरात होणाऱ्या स्वतंत्र वर्धापनदिनावर या दोन्ही पक्षांचा दावा खरा आहे,’ असे सांगून उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबत मला काही बोलायचे नाही. काय निर्णय घ्यायचे ते त्या-त्या पक्षाचे नेते ठरवतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या दोन्ही पक्षांचे प्रथमच पुण्यात वर्धापनदिनाचे कार्यक्रम होणार आहेत. फुटीआधीही या पक्षाचा पुण्यात वर्धापनदिनाचा कार्यक्रम कधी झाला नाही. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपलाच कार्यक्रम खरा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी या दोन्ही पक्षांचे दावे खरे असल्याचे सांगितले. मुंबई येथील लोकल अपघात, महापालिका निवडणुकांबाबतही त्यांनी भाष्य केले.

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय भूमिका मांडायची ती मेळाव्यात मांडली जाईल. पक्षाचे अन्य नेतेही त्याबाबत त्यांचे विचार मांडतील. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबत मला काही बोलायचे नाही. त्याबाबचा निर्णय त्या-त्या पक्षाचे नेते घेतली आणि त्यांचा निर्णय जाहीर करतील. समर्थक, पाठीराखे, हितचिंतकांना वाटते ते कार्यकर्ते बोलून दाखवितात. मात्र, कोण कधी एकत्र येणार हे तुम्हाला सांगून ठरविले जाणार नाही. प्रश्न विचारण्याचा अधिकार माध्यमांना आहे. तसेच, उत्तर द्यायचा अधिकार माझा आहे. त्यामुळे मला या प्रश्नासंदर्भात काही बोलायचे नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘प्रत्येक पक्षाचा नेते, त्याची कार्यकारिणी त्यांचे काम करीत आहे. सर्वांनीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीबाबत महायुतीचे काही नेते वेगवेगळी विधाने करत आहेत. कधी महायुती म्हणून निवडणूक लढविली जाईल, असे म्हणतात, तर कधी स्वबळ आजमावले जाईल, असे सांगतात. मात्र, निवडणुकीसंदर्भाती निर्णय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (शिंदे) वरिष्ठ नेते घेतील,’ असेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई येथील लोकल अपघाताची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, ते नाकारता येणार नाही. या प्रकरणाच्या चौकशीनंतर सर्व प्रकार पुढे येईल, अशी प्रतिक्रिया रेल्वे अपघातावर त्यांनी दिली.