बारामती: राज्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यावर सरकारने तातडीने ठोस भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.

बारामतीत माळेगाव येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, “अतिवृष्टी महाराष्ट्रासाठी नवीन नाही, पण यावेळी झालेले नुकसान अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देता येईल; पण जमीनच वाहून गेली तर त्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन कसे करायचे, हा सरकारसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे.”

ते पुढे म्हणाले, “सरकारने सांगितले आहे की आम्ही लवकरच नवी धोरण जाहीर करू. मात्र, त्यांची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. या भेटीत शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्राकडून निर्णय होण्याची अपेक्षा आहे.”