Navi Mumbai International Airport : ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून ठाणे, मुंबईतील भूमीपूत्र करत आहेत. रविवारी १४ सप्टेंबरला याच मागणीसाठी एका वेगळ्याच रॅलीचे आयोजन भूमीपुत्रांनी केले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. तसेच रॅलीचा मार्गक्रम देखील आता ठरविण्यात आला आहे. या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने आगरी कोळी भूमिपूत्र सहभागी होण्याची शक्यता आहे.
(Navi Mumbai International Airport ) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, ठाणे नवी मुंबई, कल्याण, बदलापूर भागात लाखो आगरी कोळी बांधव वास्तव्यास आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो प्रकल्पग्रस्त भूमीपूत्रांनी अनेक आंदोलने केली.
या विमानतळाच्या नामकरणासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे देखील निघाले होते. या आंदोलन आणि मोर्चामुळे राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर केला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला. परंतु सरकारकडून याबाबत हालचाली होत नसल्याचा आरोप आता केला जात आहे.
(Navi Mumbai International Airport) त्यामुळे आता कार रॅलीद्वारे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कार रॅली आयोजित केली जाणार आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी शुक्रवारी, आज कळवा येथील खारेगावमध्ये बैठक पार पडली.
यावेळी खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, दशरथ पाटील, जे.डी. तांडेल, दिपक म्हात्रे, चंद्रकांत बावकर, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक दिनेश कांबळे, राकेश पाटील, गजानन पवार, मनोज पाटील, सिकंदर केणी, सचिन पाटील, सुशांत पाटील, रवी पाटील, पावशे तसेच सर्व पदाधिकारी सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मत मांडत कार रॅलीच्या आयोजनाविषयीं तसेच विमानतळ नामकरणा विषयीं पुढील भूमिका ठरवण्यासंबंधि सविस्तर चर्चा करण्यात आली.
अशी असेल कार रॅली (Navi Mumbai International Airport)
ही कार रॅली भिवंडी येथील मानकोली नाका येथून रविवारी सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. तेथून रेतीबंदर, खारेगाव, कळवा, विटावा, दिघा, ऐरोली नाका, रबाळे नाका, रबाळे रेल्वे स्थानक मार्ग, घनसोली नाका, पावणे उड्डाणपूल, वाशी, कोपरीगाव, पामबीच, अरेंजा चौक, मोराज चौक सानपाडा, नेरुळ, करावे, नवी मुंबई महापालिका मुख्यालय चौकातून उरणकडे, रेतीबंदर, विमानतळ रेती बंदर गेट ते चिंचपाडा, पारगाव, ओवाळे आणि जासई असा या रॅलीचा मार्ग असेल.