ठाणे : मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात येत असलेला सांडपाण्याचा गाळ ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील पडलेगाव येथील तावशी येथे खाडीच्या बाजूला टाकण्यात येत आहे. रासायनिक आणि जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर परवानगीविना दिव्यात खुलेआम टाकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोका निर्माण झाला आहे, असा आरोप ठाकरे गटाने केल्याने खळबळ उडाली आहे. हा गाळ हटवून परिसर निर्जंतुक करण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढून त्याची सफाई करण्यात येत आहे. या नदीतून काढण्यात येत असलेला गाळ हा दिव्यात टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केला आहे. मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात आलेला सडलेला, रासायनिक आणि जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर परवानगी किंवा प्रक्रियाविना दिवा परिसरात खुलेआम टाकण्यात येत आहे. ही कृती केवळ बेकायदेशीर नसून, परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर थेट आघात करणारी आहे. यामुळे संपूर्ण परिसरात उग्र वास, डासांचा प्रादुर्भाव, वाऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी आणि पाणवठ्यांचे दूषितीकरण सुरू झाले आहे, असा आरोप मुंडे यांनी केला आहे.
या प्रकाराविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय हरित लवाद आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. तरीही संबंधित ठेकेदार, महापालिका प्रशासन आणि पर्यावरण विभाग या सर्वांकडून अघोषित मौन पाळण्यात येत आहे. गाळाची संरक्षित विल्हेवाट लावण्याऐवजी नागरिकांच्या दैनंदिन राहत्या परिसरात तो टाकणे हे केवळ असंवेदनशील नव्हे तर अशा कृतीसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी इतके गंभीर आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. या गाळात सांडपाण्याचे रासायनिक घटक, धातू, सेंद्रिय घनकचरा, प्लास्टिक व औद्योगिक मलमूत्राचे मिश्रण असल्याचे विविध अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे.
अशा घातक गाळामुळे नागरिकांना त्वचेच्या विकारांपासून ते श्वसनाच्या समस्यांपर्यंत त्रास होत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, आरोग्य खात्याकडून कोणतीही चौकशी अद्याप झालेली नाही, असा दावा मुंडे यांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष, ठाणे महापालिकेची गप्प भूमिका आणि महापालिकेतील ठेकेदारांच्या मनमानी यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र संताप आहेत. लवकरात लवकर हा गाळ हटवून परिसर निर्जंतुक करण्यात आला नाही, दोषींवर कारवाई झाली नाही आणि भविष्यात असा प्रकार थांबवण्याची लिखित हमी दिली गेली नाही, तर दिव्यातील जनतेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.