ठाणे : नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. ही रेल्वे वाहतुक सुरळीत झाली असली तरी प्रवाशांचा भार वाढल्याने रेल्वे स्थानकांत गर्दी झाली होती. या गर्दीमुळे अनेकांना रेल्वेगाड्यांत प्रवेश करणे शक्य झाले नाही.

नवी मुंबई शहरात लाखो नोकरदार कामानिमित्ताने जातात. सकाळी ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर प्रवाशांची गर्दी असते. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे रेल्वे स्थानकातून विविध भागातील प्रवासी नवी मुंबई गाठतात. अनेकदा काही तांत्रिक कारणांमुळे रेल्वेसेवा ठप्प होते. मंगळवारी देखील त्याचा परिणाम जाणवला. नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात काही तांत्रिक कारणामुळे येथील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. सकाळी ८.४७ नंतर येथील रेल्वे वाहतुक सुरळीत झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

परंतु रेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्याने त्यानंतर रेल्वे वाहतुक सुरळीत झाल्यानंतरही त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागला. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेचे जीने, पूल यावर गर्दी झाली होती. कामाला उशीराने जावे लागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.