भारतीय जनता पार्टी गेल्या १० वर्षांपासून देशात सत्तेवर आहे. या १० वर्षांच्या काळात भाजपा सरकारने अनेक मोठे आणि धक्कादायक निर्णय घेतल्याचं जनतेनं पाहिलं आहे. नोटबंदी करणे, जीएसटी लागू करणे, जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवणे ही त्यापैकी प्रमुख उदाहरणं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने गेल्या १० वर्षांत अनेकदा संविधान संशोधनही केलं. एनडीएकडे लोकसभेत बहुमत असल्याने आणि राज्यसभेत सर्वाधिक सदस्य असल्यामुळे मोदी सरकारला संविधानात बदल करता आले. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. भारतात सत्तास्थापन करण्यासाठी लोकसभेच्या केवळ २७२ जागा (बहुमत) जिंकणं आवश्यक असतं. मात्र भाजपाप्रणित एनडीएने देशभरात ४०० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे विरोधक भाजपाच्या या निर्धाराबाबत शंका उपस्थित करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भाजपाला देशाचं संविधान बदलायचं आहे, घटना रद्द करायची आहे”, असे दावे विरोधकांकडून होत आहेत. तसेच, “भाजपा ४०० जागा जिंकली तर यंदाची लोकसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल, देशात हुकूमशाही सुरू होईल”, असेही दावे केले जात आहेत. दरम्यान, विरोधकांच्या या आरोपांना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर देऊन त्यांची तोंडं बंद कायमची करावित अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

महायुतीच्या मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आज (१७ मे) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर संयुक्त सभा आयोजित केली होती. या सभेला पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनीदेखील सभेला संबोधित केलं.

हे ही वाचा >> “उद्धव ठाकरे म्हणाले, मी यू टर्न घेतोय, शिवसैनिकांसमोर आमची आब्रू…”, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’वरील घटनाक्रम

शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे माझी एक मागणी आहे. ते गेल्या काही सभांमधून सांगत आहेत, परंतु आज जरा त्यांनी खडसावून सांगावं. त्यांनी विरोधकांना सांगावं की या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान उभं केलं आहे, त्याला कुठेही धक्का लागणार नाही. तुम्ही (नरेंद्र मोदी) कधी आपल्या संविधानाला धक्का लावणार नव्हता, मात्र तुमचे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करत आहेत. ते पाहता त्यांना उतर देऊन तुम्ही त्यांची तोंडं एकदाची बंद करायला हवीत. त्यांची तोंडं परत कधी उघडली जाऊ नयेत यासाठी तुम्ही आज त्यांना खडसावून सांगा की आपल्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray demands to pm modi tell opposition than bjp wont change constitution asc