Mumbai Maharashtra News Updates, 06 September 2024 : राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांचे दौरे सध्या राज्यभरात सुरु आहेत. तर महायुतीचे नेते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून सरकारमधील नेते राज्यव्यापी दौरे करत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील वेगवेगळ्या यात्रा सुरू केल्या आहेत. यातच काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. यासह सर्व राजकीय घडामोडींवर आपलं या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असेल. याबरोबरच लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तर चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील आणि देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी येथे जाणून घ्या…
Maharashtra News Today, 06 September 2024
मुंबई : शेअर्समधील गुंतवणुकीच्या नावाखाली कंपनीच्या विक्री व्यवस्थापकाची ८८ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारे फसणवूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक खात्यातील व्यवहाच्या मदतीने याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली-विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या बांधकामामुळे लोकल सेवेवरील मर्यादा दूर होऊन इंधनाची बचत होईल व कार्बन उत्सर्जनात घट होईल, असे सांगत उच्च न्यायालयाने मार्गिकेच्या आड येणारी २,६१२ खारफुटी तोडण्यास परवानगी दिली. या निर्णयामुळे या मार्गिका विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
“आज माझा उपोषणाचा तिसरा दिवस आहे. राज्य सरकारने अद्यापही काहीही हालचाल केलेली नाही. माझ्या जिवाला काही बरं वाईट झालं तर संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल. हे सरकारने लक्षात घ्यावं. उद्या किंवा परवापर्यंत सरकराने दखल घेतली नाही आणि शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि कायदा हातात घेतला तर मी याचा विचार करणार नाही. दोन दिवसानंतर शेतकरी आपली बैलगाडी घेऊन समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करतील”, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती पाहायला मिळत आहे.