प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला असला तरी अद्याप मविआतील पक्ष आणि नेत्यांमध्ये योग्य ताळमेळ दिसलेला नाही. अशातच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर रविवारी (३ मार्च) अकोल्यात प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले, “आम्ही मविआचे घटक आहोत की नाही याबाबत अद्याप संभ्रमावस्थेत आहोत. आम्ही मविआचे निमंत्रक आहोत की घटक आहोत, हे अद्याप आम्हाला समजू शकलेलं नाही.” प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार आणि मविआचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची येत्या ७ मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. प्रकाश आंबेडकर हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत. वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस असे आम्ही चारही पक्ष मिळून एक मजबूत आघाडी निर्माण करू. सध्या देशाचं संविधान, लोकशाही, संसद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला दिलेले विचार या सर्व गोष्टींना धोका निर्माण झाला आहे. परंतु, आम्ही चारही पक्ष मिळून देशातील लोकशाहीसह या सर्व गोष्टी वाचवू.

प्रकाश आंबेडकर मायावतींप्रमाणे काही करणार नाहीत. मायावती या अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करतात असा शिक्का त्यांच्यावर बसला आहे. परंतु, आम्हाला विश्वास आहे की, प्रकाश आंबेडकर अशी कुठलीच कृती करणार नाहीत ज्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोदींना मदत होईल. नरेंद्र मोदी यांचं सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानत नाही. त्यामुळे हे सरकार उलथवून टाकण्याची जितकी जबाबदारी आमची आहे तितकीच ती प्रकाश आंबेडकरांचीदेखील आहे. मोदींचं सरकार डॉ. आंबेडकरांच्या विचारांना मानत नाही. मोदींच्या राज्यात आंबेडकरांची विचारसरणी दुर्लक्षित आहे. आंबेडकर दलित, शोषित, वंचित, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत होते. परंतु, मोदी या विचारांच्या विरोधात आहेत. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर आहेत. आम्ही सर्वजण मिळून देशाचं संविधान वाचवू.

हे ही वाचा >> भाजपा उमेदवारांच्या यादीतील ‘त्या’ नावावरून उद्धव ठाकरेंचा संताप; म्हणाले, “गडकरींना स्थान नाही, पण त्या…”

प्रकाश आंबेडकरांच्या संभ्रमावर संजय राऊत म्हणाले, आंबेडकर हे सन्मानिय नेते आहेत. आमचा आणि त्यांचा उत्तम संवाद चालू आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा, आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, आम्हीही करतो, तेही करतात. परंतु, आमच्यात हुकूमशाहीविरोधात लढण्यासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह मविआच्या सर्व नेत्यांचं यावर एकमत आहे. महाराष्ट्र आणि देश हुकूमशाहीमुक्त करणं हे आमचं प्रमुख ध्येय आहे. मोदी सरकारच्या काळात देशातील लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवलं जात आहे. ते आम्हाला वाचवायचं आहे. संविधानावर पाय ठेवणाऱ्यांचे पाय खेचून आम्हाला त्यांना खाली पाडायचं आहे. त्यासाठी सर्वांच्या एकीची वज्रमूठ आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही दोन दिवसांनी एकत्र बसून चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे की, प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय प्रवाहात सहभागी असल्यामुळे ते पूर्णपणे देशाच्या जनमाणसाचा अंदाज घेऊन, माहिती घेऊन इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीबरोबर राहतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on prakash ambedkar not sure vanchit bahujan aghadi included in mva asc