राहाता : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहिल्यानगर – मनमाड महामार्गाच्या कामाचा वेग अधिक वाढवा. त्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यरत करा, मागच्या कंत्राटदाराने चुकीच्या पध्दतीने गटारीची कामे केली. त्यामुळेच या मार्गाचे अधिक नुकसान झाले. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा तसेच मंजुरी मिळालेल्या कामांना तातडीने सुरुवात करा, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यात सध्या अहिल्यानगर – मनमाड, सुरत-चेन्नई, पुणे – अहिल्यानगर – संभाजीनगर, नांदूर शिंगोटे ते कोल्हार या मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. काही मार्गांची कामे सुरू आहेत तर अन्य मार्गांची कामे सुरू होण्यासाठी अन्य बाबींची पुर्तता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे यांच्या उपस्थितीत आज, सोमवारी लोणी येथे बैठक झाली. प्रकल्प संचालक धनेश स्वामी, प्रकल्प सल्लागार ओम सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळवंदे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता अभिमन्यू जमाले, उपअभियंता काशिनाथ गुंजाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

अहिल्यानगर – मनमाड मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी पुढील काही दिवस या मार्गावरील जड वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत विखे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या. वाहतूक वळविण्यात येणाऱ्या मार्गावर पावसाने पडलेले खड्डे तातडीने बुजवून हा मार्ग वाहतुकीसाठी प्राधान्याने सुरळीत करून द्यावा. कोपगावकडून नगरकडे येणारी आणि जाणारी जड वाहने अन्य मार्गाने वळविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याचे प्रकटन तातडीने जाहीर करण्याच्या सूचनाही विखे यांनी महामार्ग व पोलिसांना दिल्या.

राष्ट्रीय महामार्गांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्यात अडचणी असल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन मार्ग काढू. मात्र छोट्या गोष्टींसाठी कामे थांबवू नका, निर्धारित वेळेत कामे पूर्ण होण्यासाठी अधिकची यंत्रणा वापरा, नाशिक जिल्ह्यातील नांदुरशिंगोटे ते तालुक्यातील कोल्हारपर्यंत असलेल्या या मार्गाचे काम सुरू झाले असून, साईडपट्ट्या आणि भूसंपादनाचे काम प्रगतिपथावर आहे. सावळीविहीर ते कोपरगाव या मार्गावरील उड्डाणपुलांची कामे पूर्णत्वास गेली असून, अन्य कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यंत्रणेला काही त्रास होत असेल तर संपर्क साधा, अशी सूचनाही त्यांनी केली.