मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. जुळ्या बोगद्यासाठी आवश्यक असलेली १९.४३ हेक्टर वनजमीन मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय (MoEF&CC) यांची अंतिम मान्यता मिळाली आहे. जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत या नवीन जोडरस्त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जुळा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या या जुळ्या बोगद्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन खात्याची १९.४३ हेक्टर जागा आवश्यक होती. ही जागा वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात आहे. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, वायुवीजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसी टीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश आहे. पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची तजवीज बोगद्याखाली करण्यात आली आहे.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या टप्पा ३ (अ) अंतर्गत उड्डाणपूल, उन्नत रस्त्याचे बांधकाम, तर टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किलोमीटर लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर), तसेच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर आहे.

प्रवासाचा वेळ वाचणार

गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा असून हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये राबविला जात आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येणार आहे. मुंबईकरांच्या प्रवास वेळेत आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच, कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टन इतकी घट होणार आहे. या प्रकल्पामुळे विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा होणार असून वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत या नवीन जोडरस्त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे. इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

जमीन वळती

जुळा बोगदा प्रकल्पासाठी केंद्र सरकारची पूर्वमंजुरी मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विनंती केली होती. या प्रस्तावाचे काटेकोरपणे परीक्षण केल्यानंतर केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाने २ जानेवारी २०२४ रोजी तत्वत: मान्यता दिली. तर, १ जुलै २०२५ रोजी वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत बोगद्याच्या उभारणीसाठी १९.४३ हेक्टर राखीव वनक्षेत्र मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे.

झाडे व जमीन बाधित होणार नाही

वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत जमीन जरी महानगरपालिकेकडे वळती करण्यात आली असली तरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन जमिनीचा कायदेशीर दर्जा वने म्हणूनच कायम राहणार आहे. राष्ट्रीय उद्यानाची हद्द सुरू होण्यापूर्वी हा बोगदा जमिनीच्या पोटात जाईल आणि उद्यानाची हद्द संपल्यानंतर जमिनीच्या बाहेर येईल.

प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील कोणतीही झाडे / जमीन थेट बाधित होणार नाही. वन (संरक्षण व संवर्धन) नियम, २०२३ च्या अनुसूची-२ नुसार पर्यायी वनीकरण योजना तयार करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वसनविहीरा गावात १४.९५ हेक्टर आणि गोंडमोहाडी गावामध्ये ४.५५ हेक्टर अशा एकूण मिळून १९.५ हेक्टर वनेतर क्षेत्रात वृक्षारोपण व देखभाल केली जाणार असल्याची माहिती देखील अभिजीत बांगर यांनी दिली.