मुंबई : महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने उदंचन जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात चार महत्त्वाचे सामंजस्य करार मंगळवारी केले. या सामंजस्य कराराअंतर्गत सुमारे ३१ हजार ९५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून ६४५० मेगावॉट वीजनिर्मिती होईल आणि १५ हजार रोजगार निर्मिती होईल.
या प्रकल्पांमुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र हे राज्य पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
यासंदर्भात विधानभवन येथील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राने पंप स्टोरेजमध्ये खूप गतिशील धोरण स्वीकारले असून, प्रकल्पांची संख्या, गुंतवणूक आणि वीजनिर्मितीबाबत देशात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘नेट-झिरो’ देश बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. यासाठी आम्ही २०३० पर्यंत ५० टक्क्यांपेक्षा अधिक वीज अपारंपारिक किंवा नवीकरणीय स्त्रोतांमधून मिळविण्याचा निर्णय घेतला आहे.
सौरऊर्जा आणि पंप स्टोरेजद्वारे वीजनिर्मितीवर भर देण्यात येत असून, ग्रीडची स्थिरता राखण्यासाठी पंप स्टोरेज ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. राज्यात सौरऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून इतर पर्यायी वीजनिर्मिती क्षेत्रातही काम सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे एक लाख मेगावॉट सौरऊर्जेची निर्मिती शक्य आहे. महाराष्ट्रात मात्र भौगोलिक मर्यादेमुळे ३० ते ५० हजार मेगावॉट इतकीच सौरऊर्जा निर्माण शक्य आहे. जैवविविधतेमुळे आणि महाराष्ट्राला लाभलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमुळे पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता असून या क्षमतेचा उपयोग करून घेतला जात आहे. जलसंपदा विभागाने एक लाख मेगावॉट क्षमतेच्या पंप स्टोरेज प्रकल्पांचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवले असून, विविध उद्योगसमूहांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता हे उद्दिष्ट साध्य होईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी चार कंपन्यांबरोबर सामंजस्य करार
- ग्रीनको लि. – नयागाव (ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर), स्थापित क्षमता – २००० मेगावॉट, गुंतवणूक – नऊ हजार ६०० कोटी रुपये, रोजगार – ६०००
- ऋत्विक कोल्हापूर पीएसपी प्रा.लि. – ता. चंदगड, जि. कोल्हापूर, स्थापित क्षमता – १,२०० मेगावॉट, गुंतवणूक – सात हजार ४०५ कोटी रुपये, रोजगार निर्मिती – २,६००
- अदानी हायड्रो एनर्जी टेन लि. – अडनदी उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. चिखलदरा, जि. अमरावती, स्थापित क्षमता – १,५०० मेगावॉट, गुंतवणूक – आठ हजार २५० कोटी रुपये, रोजगार निर्मिती – ४,८००
- वॉटरफ्रंट कन्सट्रक्शन प्रा. लि. – कासारी- मुचकुंदी,( ता. लांजा, जि. रत्नागिरी), स्थापित क्षमता – १,७५० मेगावॉट, गुंतवणूक – सहा हजार ७०० कोटी रुपये, रोजगार निर्मिती – १,६००