जळगाव – पश्चिम रेल्वेने भुसावळ-दादर स्थानकांदरम्यान सुरू केलेल्या विशेष गाड्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, या दोन्ही गाड्या २९ सप्टेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहेत. अमळनेर, नंदुरबारमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या खान्देशातील प्रवाशांची मोठी सोय त्यामुळे होऊ शकणार आहे.

पश्चिम रेल्वेकडून नंदुरबार-दादर स्थानकांदरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय जून २०२४ मध्ये घेण्यात आला होता. मात्र, नवीन गाडी नंदुरबारऐवजी भुसावळहून सोडण्याची मागणी खान्देशातील प्रवाशांकडून करण्यात आली. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला.

अखेर दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ-दादर (०९०५२) या दोन्ही त्रिसाप्ताहिक विशेष गाड्या आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावू लागल्या. तसेच दादर-भुसावळ (०९०४९ ) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावू लागली. आठवड्यातून चार दिवस धावणाऱ्या गाड्यांना सुरूवातीला २७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

पुढे जाऊन प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दोन्ही गाड्यांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. सदरची मुदतवाढ ३० जून रोजी संपणार असल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने भुसावळ-दादर दरम्यानच्या साप्ताहिक व त्रिसाप्ताहिक गाड्यांना पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

पश्चिम रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, दादर-भुसावळ (०९०४९ ) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी चार जुलैपासून २६ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ-दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी दोन जुलैपासून २९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.