पिंपरी : बारामती लोकसभेत विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मावळ लोकसभेत उमटलेले पडसाद, राष्ट्रवादी आणि भाजपने मावळ मतदारसंघावर केलेला दावा, विकासाचे दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, गुगली प्रश्नांना दिलेली सफाईदार उत्तरे आणि एकूणातच खुसखुशीत व परखड चर्चेमुळे मावळ लोकसभेचा रणसंग्राम चांगलाच रंगला. यानिमित्ताने मावळचे प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आलेच. निवडणुकीचे राजकीय वातावरणही अक्षरशः ढवळून निघाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात ‘मावळ लोकसभेचा रणसंग्राम’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यात सहभागी झाले होते.

हेही वाचा…शिवतारे गरजले, “बारामतीमधून पवार यांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध..”

जवळपास दोन तास चाललेल्या या चर्चेदरम्यान उपस्थित नेत्यांनी मावळ मतदारसंघातील विविध प्रश्न तथा समस्यांवर आधारित आपापली भूमिका विस्ताराने मांडली. प्रश्नोत्तराच्या सत्रात मुलाखतकारांनी विचारलेल्या गुगली प्रश्नांना नेत्यांनी सफाईदारपणे उत्तरे दिली. क्षणाक्षणाला होणाऱ्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मावळ मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षात झालेल्या विविध विकासकामांची जंत्री खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी सादर केली. अजूनही काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून काही नियोजनात आहे. हीच विकासकामे घेऊन आगामी निवडणुकीत जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी भाजपच्या चिन्हावर उभा राहणार नसून शिवसेनेचाच उमेदवार असल्याचा दावाही बारणे यांनी यावेळी केला.

संजोग वाघेरे म्हणाले की, मावळ मतदारसंघाच्या विकासाबाबत केले जाणारे दावे फोल आहेत. विकास कुठेही दिसून येत नाही. हजारो कोटींचा निधी मावळसाठी मिळाला असूनही त्याचा विनियोग झालेला नाही. रायगड जिल्ह्यातील अनेक उद्योजक सुविधा मिळत नसल्याने पळून गेले आहेत. स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्याने युवक निराश आहेत. रेडझोन, पाणी प्रश्न, आरोग्यव्यवस्था, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला अद्यापही दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नद्या प्रचंड अस्वच्छ आहेत. पिंपरी ते निगडी मेट्रोचा विस्तार झाला नाही. हिंजवडी मेट्रो पिंपळे सौदागर मार्गे जाणे अपेक्षित आहे. पुणे लोणावळा लोकल फेऱ्यांमध्ये व्हायला हवी. कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी रेल्वेस्टेशनचा विकास झाला नाही.

हेही वाचा…पुणे : निवडणुकीतील गैरप्रकारांवर २६४ पथकांकडून देखरेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होतो आहे. शेतकरी, गरीब, कामगार, युवकांच्या कल्याणाचे धोरण राबवण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. स्वातंत्र्याचा शतकोत्तर महोत्सव २०४७ मध्ये साजरा करताना, भारत देश महासत्ता होण्यासाठी २०२४ ची निवडणूक पायाभरणी ठरणारी आहे. मावळ मतदारसंघावर भाजपचा पूर्वीपासूनच दावा आहे. संपूर्ण मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे. पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता भाजपला मावळ मतदारसंघ मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र, सरतेशेवटी वरिष्ठ नेते महायुतीचा जो उमेदवार देतील. तो निवडून आणण्याची जबाबदारी शहर भाजपा पूर्ण करेल, असे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले.

हेही वाचा…पिंपरी : सभांसाठी ‘ही’ ६६ ठिकाणे निश्चित

खडाजंगी, गदारोळ…

पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून खासदार श्रीरंग बारणे व मारुती भापकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या दरम्यान दोघांच्याही समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ गदारोळ झाला. भापकरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी यांनी ४५० सभा घेतल्या त्यावेळेस त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या ठरल्या. मोदींनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. भय आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ म्हणाले. प्रत्यक्षात त्याच्या उलट परिस्थिती आज दिसून येते. नोकऱ्यांचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात प्रचंड बेरोजगारी वाढली. झोपडपट्टीवासियांना घरे मिळाली नाहीत. कारखाने नाहीत, रोजगारही नाही. खासदार बारणे यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. बेकायदा बांधकामासंदर्भात आम्ही सुरू केलेले आंदोलन बारणे यांनी हायजॅक केले. त्या विषयाचे भांडवल करूनच ते खासदार झाले. भापकरांच्या या विधानावरून बराच गदारोळ झाला. भापकर धादांत खोटं बोलतं आहेत, असे सांगून बारणे यांनी त्यांच्या आरोपांचे खंडन केले. एका टेबलवर समोरासमोर बसून प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान बारणे यांनी भापकरांना दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Battle unfolds in maval lok sabha ransangram program debates and discussions between candidate political party members pune print news ggy 03 psg