पिंपरी : ‘हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता कोणतीही तिसरी भारतीय भाषा विद्यार्थ्यांना शिकता येईल. या धोरणात मातृभाषा अनिवार्य असून, अन्य दोन भाषांपैकी एक भारतीय भाषा असली पाहिजे. इंग्रजीचा पुरस्कार केला जातो. पण, भारतीय भाषेचा तिरस्कार करणे योग्य नाही. तिसऱ्या भाषेत हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कोणतीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण बुधवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ‘हिंदीचे शिक्षक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने तिसऱ्या भारतीय भाषेत सुरुवातीला हिंदी भाषा अनिवार्य केली होती. मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या शासनादेशात अनिवार्यतेचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता कोणतीही तिसरी भारतीय भाषा शिकता येईल. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषा अनिवार्य आहे. त्या व्यतिरिक्त दोन भाषा आणि त्यातील एक भारतीय भाषा असली पाहिजे. त्यासाठी २० विद्यार्थी असतील, तर शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. ऑनलाइन पद्धतीनेही प्रशिक्षण दिले जाईल.’

‘भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत. इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला ज्ञान आणि अर्थकारणाची भाषा बनण्याचा मार्ग खुला केला आहे. अभियांत्रिकी, एमबीए, वैद्यकीय शिक्षण मराठीत शिकविले जात आहे. त्यामुळे असा वाद योग्य नाही. कोणत्याही प्रकारच्या शाळेत मराठी अनिवार्य आहे. मराठीला पर्याय नसून, हिंदीला पर्याय आहेत,’ असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न

‘दोनच भाषा असाव्यात, तिसरी भाषा लादू नका, असा राज ठाकरे यांचा आग्रह आहे. केंद्र सरकारने विचारपूर्वक देशासाठी तीन भाषांचे सूत्र आणले आहे. देशभरातील तज्ज्ञांनी हे धोरण तयार केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, याबाबत ठाकरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘बडगुजरांवर कोणतीही कारवाई नाही’

‘नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका करून नीतेश राणे यांनी चित्रफीत प्रसिद्ध केली होती, हे खरे आहे. त्यानंतर दाखल गुन्ह्याची चौकशी झाली. चौकशीअंती बडगुजर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी भाजपविरोधात निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर त्यांनी पक्षात येण्याची इच्छा दाखवली. पक्षात येणाऱ्याचे स्वागत केले जाते. त्यांनी जुना इतिहास, वागण्याची पद्धत बाजूला ठेवून भाजपच्या नीती, नियमाने वागावे. पक्षप्रवेशाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सकाळी कल्पना नव्हती. प्रवेशाची माहिती मिळताच बावनकुळे हजर होते. संवादाचा अभाव राहिला, विरोध कोणाचा नव्हता. स्थानिक स्तरावर विरोध झाला. पक्ष वाढवायचा असल्याचे सांगून त्यांचीही समजूत काढण्यात आली,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भाजपसोबत जाणाऱ्या संधिसाधूंसोबत जाणार नसल्याचे शरद पवार यांचे विधान मी ऐकले नाही. त्यात मला पडायचे नाही. मला ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ व्हायचे नाही. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.