ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून १३ प्रवासी पडून दुर्घटना घडली. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यु झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मनसेने मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे स्थानक परिसरात मोर्चा काढला. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रवाशांनी महिलांसाठी असलेल्या सुविधांवरील असंतोष व्यक्त करत, स्वत:च्या समस्या मांडत प्रशासनावर परखड टीका केली.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक तीन आणि चारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा या लोकल गाड्यामध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याची घटना घडली. या घटनेत लोकल गाडीतील एकूण १३ प्रवासी रेल्वे रूळावर पडल्याची उघडकीस आले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेला आल्या. या अपघाताच्या निषेधार्थ मनसेने आक्रमक होत ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे स्थानक परिसरात मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात मोर्चा काढला.या मोर्चात आपल्या समस्या मांडण्यासाठी अनेक प्रवाशांनी सहभाग नोंदवला. या मोर्चात सहभागी महिलांनी रेल्वे समस्यांचा पाढाच वाचण्यास सुरूवात केली. प्रथम श्रेणी डब्यांतील असुविधांबाबत प्रामुख्याने नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.
महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यात केवळ १३ आसने आहेत. मात्र,यातून दररोज ६० ते ७० महिला प्रवासी प्रवास करतात. दररोज जागेवरून महिलांची भांडणे होतात. याचा त्रास इतर प्रवाशांना होत असतो, अशी तक्रार एका महिला प्रवाशांनी केली. या समस्यांवर नक्की पर्याय काय? असा प्रश्न देखिल त्यांनी उपस्थित केला. तसेच प्रत्येक स्थानकात स्वच्छ शौचालयाची सुविधा असावी. अस्वच्छतेमुळे महिलांना अनेक अडचणी येतात. तसेच प्रथम श्रेणी डब्यांमध्ये तिकीट तपासणी अधिकारी (टीसी) असावा. अनेकदा द्वितीय श्रेणीतील प्रवासी गैररित्या प्रथम श्रेणी डब्यात शिरतात, यामुळे नियमित दुप्पटीने पैसे भरून तिकीट घेणाऱ्या महिलांना जागा मिळत नाही. प्रशासनाने महिलांसाठीच्या डब्यांची संख्या वाढवावी, स्वच्छता आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली.