Where Are 25 Interchanges On Samruddhi Mahamarg: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते भिवंडीजवळील आमणे या शेवटच्या ७६ किमीच्या टप्प्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्रीही उपस्थित होते. या टप्प्याच्या उद्घाटनामुळे आता ७०१ किमीचा संपूर्ण एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.
नुकताच पूर्ण झालेला हा टप्पा डोंगराळ सह्याद्रीच्या रांगांमधून जातो. या टप्प्यामध्ये अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो. महामार्गावर प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी या टप्प्यात इगतपुरी, खुटघर आणि आमणे येथे तीन इंटरचेंजदेखील बांधण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. या एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. याचबरोबर ठाणे–मुंबई कॉरिडॉरवरून शिर्डीला जाणाऱ्यांना आणि नाशिक जिल्ह्यातून मुंबई महानगर प्रदेशात शेतीमाल घेऊन जाणाऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, तब्बल ७०१ किलोमीटर लांबीच्या या मुंबई-नागपूर महामार्गावर विविध जिल्ह्यांतून प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी २५ ठिकाणी इंटरचेंज बांधण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना या मार्गावरील विविध ठिकाणांहून महामार्गावर प्रवेश करता येणार आहे.
समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर केवळ महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास नाही तर संपूर्ण राज्यात सुरक्षित प्रवास, आर्थिक विकास आणि चांगली कनेक्टिव्हिटी वाढविण्यास मदत करू शकतो.
समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज
- नागपूर आणि वर्धा जिल्हा: शिवमदाका, डतला, वडगाव बक्षी-सेल्दो आणि विरुल
- अमरावती जिल्हा: धामणगाव, गावणेर, तळेगाव
- वाशिम जिल्हा: कारंजा लाड, सेलू बाजार/वनोजा, मालेगाव
- बुलढाणा जिल्हा: मेहकर, दुसरबीड, पलाशेखेड/मालकदेव
- जालना जिल्हा: जामवाडी, निधोना
- छत्रपती संभाजीनंगर जिल्हा: सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, वैजापूर
- अहिल्यानंगर जिल्हा: कोकमथान
- नाशिक जिल्हा: गोंदे, भरवीर, पिंपरी सदरुद्दीन
- ठाणे जिल्हा: फुगाळे, वाशाला, खुटघर/सपगाव
© IE Online Media Services (P) Ltd