मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला असून शनिवारी मध्यरात्रीही मुसळधार पाऊस कोसळत होता. शहर, तसेच उपनगरात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर राज्यातही पावासाचा जोर वाढला असून मुंबई , ठाणे, पालघर,रायगड, पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसराला आज अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत शनिवारी सायंकाळपासून पावसाचा जोर होता. मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. अनेक भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या २४ तासांत म्हणजेच शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० दरम्यान कुलाबा येथे सर्वाधिक १२० मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल जुहू ८८ मिमी, सांताक्रूझ ८३.८ मिमी, वांद्रे ८२.५ मिमी, आणि महालक्ष्मी येथे २८ मिमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यातील पहिला पंधरवडा कोरडा गेला. त्यानंतर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानाबरोबरच उकाड्यातही वाढ झाली होती. मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. याचबरोबर काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सखलभागात पाणी साचण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.
आज पावसाचा इशारा कुठे?
अतिवृष्टी (रेड अलर्ट)
मुंबई, ठाणे, पालघर , सिंधुदुर्ग,रायगड, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर
अतिमुसळधार ते अतिवृष्टी (ऑरेंज अलर्ट)
रत्नागिरी, सातारा घाट परिसर, कोल्हापूर, पुणे
मेघगर्जनेसह पाऊस
जालना, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, अमरावती , अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर
पूरस्थिती निर्माण होण्याची भीती
गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेकांचे जीव गेले, शेतीचे नुकसान झाले. तिकडच्या परिस्थितीत अजून काही सुधारणा झालेली नाही. अशातच पुन्हा पाऊस सक्रिय झाल्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.