पुणे : दमदार पावसामुळे राज्यातील पेरण्यांचे प्रमाण वाढले असून, आत्तापर्यंत २३.२७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी १९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात ३३ लाख ५९ हजार ८१ हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत.
राज्यात सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. यंदा खरीप हंगामात ऊस वगळून राज्यात ३३ लाख ५९ हजार ८१ हेक्टर जमिनीवर २३.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
विभागनिहाय पेरण्यांमध्ये कोकणात १६ हजार ७९ हेक्टर जमिनीवर ४.१० टक्के, नाशिक विभागात पाच लाख नऊ हजार १११ हेक्टर जमिनीवर २५.०४ टक्के, पुणे विभागात चार लाख ५१ हजार ५०७ हेक्टर जमिनीवर ३५.९४ टक्के, कोल्हापूर विभागात एक लाख ६८ हजार ५६८ हेक्टर जमिनीवर २३.२६ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात सहा लाख ५७ हजार १९९ हेक्टर जमिनीवर ३०.६८ टक्के, लातूर विभागात नऊ लाख चार हजार २०२ हेक्टर जमिनीवर ३१.९४ टक्के, अमरावती विभागात पाच लाख ६१ हजार ८८० हेक्टर जमिनीवर १७.७८ टक्के आणि नागपूर विभागात ९० हजार ५३५ हेक्टर जमिनीवर ४.७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. राज्यात सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.