मुंबई : अतिवृष्टीने उद्धस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने शेतकऱ्यांना एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

ठाकरे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. पावसामुळे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.

संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्यासाठी सरकारने कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३०-४० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. केंद्र सरकारने बिहारला जसे मदतीचे पॅकेज दिले आहे. अशीच मदत महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. त्यासाठी दिल्लीला पाठपुरावा करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असे चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे असा टोलाही त्यांनी लगावला.

अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते. त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावे. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावे. बँकाकडून कर्ज वसुलीची सक्ती होणार नाही याची सरकारने खबरदारी घ्यावी. जर बँकाची शेतकऱ्यांची छळवणूक केली तर मनसेचे कार्यकर्ते बँकाना धडा शिकवतील असा इशाराही त्यांनी दिला.