Mumbai Breaking News Updates, 14 February 2025 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात काल माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काल अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. याचबरोबर विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षेनेतेपदी निवड करण्यास मान्यता दिली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. यासाठी फडणवीस नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ते महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे.
निर्बीजीकरणावर कोटींचा खर्च; भटके श्वान मात्र जैसे थे, उल्हासनगरात अजूनही चार हजार श्वान निर्बीजीकरणाविना
उल्हासनगर : उल्हासनगर शहरात भटक्या श्वानांमुळे नागरिक जीव धोक्यात घालून राहत असून दोनच दिवसांपूर्वी येथील कॅम्प एक परिसरात एकाच दिवसात सहा जणांना भटक्या श्वानाने चावा घेतल्याचे समोर आले. मात्र भटक्या श्वानांकडून झालेल्या हल्ल्यांची संख्या मोठी आहे.
नाशिक महापालिकेकडून भूखंड विकास शुल्कात वाढ, जुन्या दराच्या तुलनेत साडेतीनपट अधिक
नाशिक : निव्वळ भूखंड क्षेत्रासाठी पाणी पुरवठा, मलवाहिका, विद्युत व रस्ते यासाठी प्रतिचौरस मीटर दोन हजारहून अधिक खर्च येत असल्याने महानगरपालिकेने भूखंड विकास शुल्कात वाढ केली. त्यानुसार सध्याचे १०५ रुपयांवर असणारे शुल्क ३५० रुपये प्रतिचौरस मीटरवर गेले आहे.
पालकांनी १० हजारात बालिकेला विकले, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्याचा प्रताप
ठाणे : उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या आणि कुटुंबियांच्या सांगण्यावर आपल्या एक महिन्याच्या बालिकेला कळव्यातील एका कुटुंबाला कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय १० हजार रुपयात दत्तक दिले असल्याची माहिती उघड झाली आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाचा निर्णय देणारे न्यायमूर्ती म्हणाले, बदलीची टांगती तलवार होती…
नागपूर : १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निर्णय सुनावण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार होती आणि यामुळे मोठा धक्का बसला होता असा गौप्यस्फोट या प्रकरणाचा निर्णय देणारे तत्कालीन टाडा न्यायालयाचे न्या.गोविंद सानप यांनी केला. गळ्यावर बदलीची टांगती तलवार असताना निर्णय कसा देणार अशी तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केल्यावर त्यांची बदली काही काळापुरती स्थगित झाली आणि न्या.सानप यांनी खटल्याचा निर्णय दिला.
श्वान देखभाल केंद्र अखेर बंद करण्याचे आदेश
ठाणे : येऊर येथील एका पाळीव प्राणी देखभाल केंद्रात ठेवलेल्या श्वानाला केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर श्वान मालकाने पेटा आणि प्राणीमित्र संघटनांच्या मदतीने पाठपुरावा केल्यानंतर या प्राणी देखभाल केंद्राकडे बोर्डींग संदर्भातील कोणताही परवाना आढळून आला नसल्याचे समोर आले.
डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलाचे नुतनीकरण, ३६ कोटीच्या निधीतून क्रीडासंकुलाला नवे रूप
कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील घरडा सर्कल येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या नियंत्रणाखालील सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या नुतनीकरणाचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सुमारे २६ कोटीचा निधी पालिकेला उपलब्ध करून दिला आहे.
विमानतळावरून नऊ कोटींचे हिरे व सोने जप्त, हवाला व्यवहारांसाठी हिऱ्यांची तस्करी ?
मुंबई : सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सहा किलो सोने व २१४७ कॅरेट हिरे जप्त केले असून त्यांची किंमत सव्वानऊ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण, ८५ हजार सदनिकांवर क्रमांक टाकण्याचे कामही पूर्ण
मुंबई : मागील काही महिन्यांपासून नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत धारावीतील ८५ हजार सदनिकांना क्रमांक देण्याचे काम एनएमडीपीएलने पूर्ण केले. ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
‘एचएसआरपी ‘ला पुणेकरांचा अल्प प्रतिसाद, आरटीओने घेतला कोणता निर्णय ?
पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) निर्देशानुसार पुणे शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट -एचएसआरपी) बसवून घेण्यासाठी पुणेकरांचा अल्प प्रतिसाद असल्याचे समोर आले आहे.
मद्याधुंद बसचालकावर कारवाई
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसचालकाने मद्याधुंद अवस्थेत बस चालवून अपघात केल्याप्रकरणी संबंधित बसचालकाला सेवेतून काढून टाकल्याची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या पुढे अशा घटना घडू नये, म्हणून बसचालकांना सूचना देण्यात आल्याची माहिती ‘एसटी’ महामंडळाच्या पुणे विभागाकडून देण्यात आली.पुणे ‘एसटी’ महामंडळाकडून दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट बसस्थानकातून रात्री धाराशीवला जाणारी बस स्वारगेटवरून ४४ प्रवासी घेऊन निघाली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात यंदा पहिल्यांदाच २०० कोटींचा निधी ! , मार्चच्या पहिल्या आठवड्यात ‘स्थायी’समोर सादर होण्याची शक्यता
पुणे : ‘भूसंपादन होत नसल्याने शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे प्रलंबित राहतात. प्रकल्पांची कामे मार्गी लागावीत, यासाठी चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात २०० कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी ठेवला जाणार आहे,’ अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाला येणार आठ हजार कोटींचा खर्च ! सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार
पुणे : शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला येरवडा ते कात्रज हा भुयारी मार्ग २० किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाच्या १ किलोमीटरसाठी साधारणपणे ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे ८ हजार कोटींचा निधी लागणार आहे.
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘जेएनयू’पेक्षाही डावे’… ‘जेएनयू’च्याच कुलगुरूंचे विधान
‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठापेक्षा (जेएनयू) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डावे आहे,’ असे विधान जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री धुलिपुडी पंडित यांनी गुरुवारी येथे केले. ‘मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केले आहे. सविस्तर वाचा…
उंदीर, ढेकणांच्या निर्मूलनासाठी त्वरित उपाययोजना करा…, डॉ. नीलम गोऱ्हे यांची विद्यापीठ प्रशासनाला सूचना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदीर, ढेकणांचा सुळसुळाट झाल्याच्या वृत्ताची दखल थेट विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. सविस्तर वाचा…
शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे शिवजयंतीला लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा पूर्णत्वास आला असून येत्या शिवजयंतीला (दि. १९ फेब्रुवारी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार…, राज्य सरकारचा पुढाकार; पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
राज्य सरकार मुंबईतील दहा एकर जागेत मनोरंजन क्षेत्राताच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी सांगितले. सविस्तर वाचा…
देहूरोडमध्ये अंदाधुंद गोळीबार; दोन जखमी एकाचा मृत्यू , दुचाकीवरून जात असताना थेट गोळीबार करण्यात आला
पिंपरी- चिंचवड मधील देहूरोड मध्ये गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला असून सीसीटीव्ही मध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांवर सराईत गुन्हेगार अंदाधुंद फायरिंग करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. सविस्तर वाचा…
पीएमपीएमएलच्या ताफ्यात एक हजार बस कधी येणार ? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाला निर्णय
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात एक हजार बस दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शहरबात : पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवाचे ना सोयर, ना सुतक!
आपलाच इतिहास आणि वारसा याचे विस्मरण व्हावे, यासारखे दुर्दैवी काही असू शकत नाही. पुणे महापालिका ही राज्यातच नव्हे तर देशात नामांकित. जगाच्या पटलावर पुण्याचे नाव सर्वज्ञात असले, तरी आपलाच अमृतमहोत्सव विसरण्याची चूक पुणे महापालिकेच्या प्रशासनाने केली आहे. सविस्तर वाचा…
चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची मोठी गरज ; डॉ. अनंत लाभसेटवार यांचे मत
चीनचे वाढते व्यापारी वर्चस्व रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची मोठी गरज आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताशी दृढ संबंध कायम करतील, असा विश्वास डॉ. अनंत लाभसेटवार यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा…
रायगड जिल्हा परीषदेत कोटयवधींचा भ्रष्टाचार; वेतन फरक दाखवून कर्मचाऱ्याने रकमा आपल्या खात्यात वळवल्या
रायगड जिल्हा परीषदेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने पगार बीले तयार करताना कर्मचाऱ्यांचे नसलेले कपात किंवा वेतन फरक दाखवून, या रकमा तो आपल्या खात्यावर वळवत असे. अन्य विभागात कार्यरत असताना कोरडे याने असे उपदव्याप केल्याची बाब समोर आली आहे. सविस्तर वाचा…
यंत्रमाग उद्योगातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न; वस्त्रोद्योग संचालकांचे आश्वासन
विकेंद्रित यंत्रमागाच्या प्रश्नाबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाला वास्तवदर्शी अहवाल सादर करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन संचालक सतीशकुमार सिंग यांनी गुरुवारी विटा येथे दिले. सविस्तर वाचा…
कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रकल्प राबवावा ; उदयनराजे यांची भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी
नमामी गंगे योजनेच्या धर्तीवर कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘जय जय कृष्णे’ हा कृष्णा नदी शुध्दीकरणासाठी प्रकल्प राबवण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेऊन केली.
सावधान ! पीओपीच्या मूर्ती बनविताय ? काय आहे महापालिकेची नियमावली…
पुणे : गणेशोत्सवासह विविध सण, उत्सवात यंदाच्या वर्षापासून आता ‘पीओपी’च्या मूर्ती तयार करता येणार नाहीत. उच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिले असून, त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी काढले आहेत.
Maharashtra News Live Update Today, 14 February 2025: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचे सुप्रिया सुळेंकडून अभिनंदन
काँग्रेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सपकाळ यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
Maharashtra News Live Update Today, 14 February 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. यासाठी फडणवीस नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ते महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे.