शिक्षण व्यवस्थेची ऐशीतैशी करीत संस्थाचालकांनी घातलेला मोठा घोळ मराठवाडय़ाच्या मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे समोर आला आहे. येथील निवासी आश्रमशाळेतून दहावीच्या परीक्षेसाठी एकाच तुकडीतून ९७१ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. एकाच तुकडीत एवढे विद्यार्थी कसे, असा प्रश्न उपस्थित न करता परीक्षा अर्ज स्वीकारण्यात आले. एवढे विद्यार्थी आले कोठून, याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या शिक्षणाधिकारी व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेचे कुलूप बघून परतावे लागले.
या शाळेच्या परीक्षा केंद्राची मान्यता काढून घेऊन मानवत येथील शकुंतलाबाई कामवार विद्यालयात येथील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेस बसणाऱ्या अर्ज करणाऱ्या ९७१ पैकी सुमारे ५४७ विद्यार्थ्यांनीच हॉल तिकीट ताब्यात घेतले. त्यामुळे बाकीचे विद्यार्थी कोठे गेले, असा शोध आता सुरू झाला आहे. त्यामुळेच मंगळवारी होणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या दिवशी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव सुखदेव डेरे या केंद्राला स्वत: भेट देणार आहेत.
केकरजवळा येथील ही निवासी आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थाचालकाचे नाव दत्ता मते असे असून ते सध्या ‘बेपत्ता’ आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांकही बंद आहे. हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे काय, याची माहितीही उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, केकरजवळा शाळेतून दरवर्षी दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी बसविले जातात. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातील नोंदीनुसार २०११ मध्ये १०, २०१२ मध्ये ४९, २०१३ मध्ये ८६, २०१४ मध्ये १४६ व २०१५ मध्ये ४२३ विद्यार्थ्यांनी या केंद्रावरून परीक्षा दिली. या परीक्षा केंद्राची तपासणी केल्यानंतर इमारत मोडकळीस आलेली. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाके नाहीत. खोल्यांमध्ये पंख्याची सोय नाही, पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे येथील परीक्षा केंद्र रद्द करावे, असा अहवाल पाठविण्यात आला. त्यानुसार परीक्षा मंडळातील अधिकाऱ्यांनी तेथील परीक्षा केंद्र रद्द केले.
मात्र, एकाच तुकडीतून ९७१ विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर ही संख्या खरी की खोटी, हे तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. संस्थाचालकांकडे प्रवेश नोंदींविषयीची माहिती मागविण्यात आली. प्रवेश प्रमाणपत्रे घेऊन या असे शिक्षण अधिकाऱ्यांनी कळविले. दत्ता मते आणि त्याच्या चुलतभावाने शिक्षण अधिकाऱ्यांना उलटसुलट उत्तरे दिली. त्यांनी तसा अहवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळासही पाठविला. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे या शाळेतून परीक्षेस बसण्याचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख ही १९८२, १९८५ अशीसुद्धा नोंदवली आहे. साधारणत: सोळाव्या वर्षी विद्यार्थी दहावीपर्यंत पोहोचतो. येथील केंद्रातून आता ३२ आणि ३४ व्या वर्षी काही विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
जन्मतारखांचा हा घोळ कसा असू शकेल, या बाबत बोलताना मंडळाचे सचिव डेरे म्हणाले, की सरकारने आता वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे ही अट अनिवार्य असल्याने काही जणांनी पुन्हा परीक्षा देण्याचे ठरविलेले असू शकते. परीक्षेपासून कोणी वंचित राहू नये म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र केंद्र निर्माण करून देण्यात आले आहे. मात्र, या केंद्रातून किती जण परीक्षा देतील, हा प्रश्नच आहे. सुमारे ५४७ जणांनीच हॉल तिकीट ताब्यात घेतले आहे, त्यामुळे ४२४ विद्यार्थ्यांचा शोध सध्या सुरू आहे. निवासी आश्रमशाळांना दिले जाणारे सरकारी अनुदान अधिक असल्यामुळे बनावट नोंदी केल्या जातात. या नोंदी आता उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या शाळेवर काय कारवाई होईल, याकडे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10th exam one division 971 students