स्वयंपाक केल्यानंतर, जेवल्यानंतर बेसिनमध्ये ठेवलेल्या खरकट्या आणि अस्वच्छ भांड्यांचा ढीग घासणे अनेकांना नापसंत असते. ज्यांना शक्य असते ते घरकामासाठी बाई ठेवतात; तर, बऱ्याचजणांकडे डिश वॉशरदेखील असतात. वापरलेली खरकटी भांडी धुवून स्वच्छ, चमकदार झाली कि ती पुन्हा वापरण्यासाठी तयार होतात. मात्र जर ही भांडी नीट किंवा योग्य पद्धतीने स्वच्छ केली गेली नाही तर त्यावर अनेक जीवजंतू घर करून राहू शकतात. कालांतराने भांड्यांना वास येऊ लागतो.

कोणत्याही व्यक्तीला त्याच्या स्वयंपाकघरात अशी दुर्गंधी भांडी मुळीच आवडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही भांडी घासताना खाली सांगितलेल्या पाच चुका तर करत नाहीत ना, याची खात्री करा. भांडी घासण्याचा या पाच टिप्स एनडीटिव्हीच्या एका लेखावरून समजतात.

हेही वाचा : Kitchen tips : मातीची भांडी वापरल्यावर कशी धुवावी? काय करावे, काय नको पाहा

भांडी घासताना कोणत्या चुका करू नयेत पाहा :

१. गरम पाण्याचा वापर

तुम्ही भांडी घासण्यासाठी गरम पाण्याचा वापर करता का? असे असेल तर ही चूक अजिबात करू नका. भांड्यांवरील चिकट डाग सहजतेने काढून टाकण्यास गरम पाणी मदत करत असले तरीही, ते तुमच्या हातांसाठी चांगले नाही. भांडी घासताना हात सतत पाण्यात असता. अशा वेळेस गरम पाणी हाताची त्वचा कोरडी करू शकतात अथवा कधीतरी लक्ष नसताना हाताला चटकादेखील बसू शकतो. असे होऊ नये यासाठी, भांडी घासताना गार पाण्याचा अथवा कोमट पाण्याचा वापर करा. तसेच भांड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी तुम्ही ती भांडी वेगळी करून केवळ त्यांच्यासाठी गरम पाण्याचा वापर करू शकता.

२. साबणाचा अतिवापर वापर

खरकटी भांडी स्वच्छ निघावी, त्यांना कोणताही वास येऊ नये यासाठी अनेकजण भांडी घासताना भरपूर प्रमाणात साबण वापरतात. मात्र खरं पाहायला गेलं, तर भांडी घासताना भरपूर साबणाची गरज नसते. उलट तुम्ही भांडी घासताना साबणाचा अतिरेक केलात तर भांडी धुताना, भांड्याना साबण तसाच राहते. त्यामुळे, शक्यतो लिक्विड साबणाचा वापर करा. अशा साबणाचे केवळ काही थेंब भांडी चमकवून देण्यास उपयुक्त ठरतात.

हेही वाचा : Kitchen tips : पीठ चाळायची भन्नाट Viral हॅक! पाहा, जमिनीवर अजिबात होणार नाही पसारा…

३. भांड्यांसाठी जुने, अस्वच्छ स्पंजचा वापर

आपल्यापैकी अनेकांना, जुने आणि सतत वापरून अस्वच्छ झालेले स्पंज वापरण्याची सवय असते. जोपर्यंत भांड्यांचा स्पंज पूर्णतः खरा होत नाही तोपर्यंत आपण त्याचा वापर करतो. मात्र असे करणे खूप चुकीचे आहे. कारण – भांडी घासणाऱ्या स्पंजमध्ये खरकट्या अन्नाचे लहान-लहान कण अडकून बसतात. कालांतराने त्या कणांमुळे स्पंज खराब होऊन त्याला घाणेरडा वास येऊ लागतो. त्यामुळे अशा स्पंजचा आपल्या भांड्यांवर वापर केल्यास, स्पंजमधील जंतू आपल्या भांड्यांना लागू शकतात. असे होऊ नये यासाठी वेळोवेळी भांडी घासण्याचे स्पंज, घासणी, काथ्या बदलत राहावे.

४. बेसिन / सिंक न घासणे

अस्वच्छ भांडी घासून झाल्यावर आपले काम संपले असे तुम्हाला वाटत असेल तर ते अगदीच चुकीचे आहे. न घासलेले, अस्वच्छ सिंक म्हणजे जीवजंतूंची सर्वात आवडती जागा असते. अशा डोळ्यांना न दिसणाऱ्या, जीवजंतूंनी भरलेल्या सिंकमध्ये तुम्ही तुमची भांडी ठेवलीत तर साहजिकच ते जिवाणू त्यांच्यावर घर करू शकतात. असे होऊ नये यासाठी, भांडी घासून झाल्यानंतर थोडा वेळ काढून सिंकदेखील व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.

५. भांडी पूर्णतः वाळू न देणे

भांडी घासून झाल्यावर लगेचच त्यांना जागच्याजागी ठेवण्याची अजिबात घाई करू नका. ओली भांडी पूर्णतः वाळल्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवर लावून ठेवा. अथवा, ओली भांडी एखाद्या कापडाने पुसून कोरडी करून जागेवर ठेवा. ओली भांडी कपाटात ठेवल्यास त्यांवर बुरशी लागू शकते. परिणामी त्यावर जीवजंतू घर करू शकतात. त्यामुळे ओली भांडी कपाटात ठेवू नये.