मुंबई : करोनामुळे विशेषत: गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या ओमायक्रॉनमुळे बंद करण्यात आलेली राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत, समूह विद्यापीठांचे नियमित वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मान्यता दिली. त्यानुसार करोनाची स्थानिक परिस्थिती पाहून महाविद्यालये सुरू करण्याचे अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनास देण्यात आले  आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या संसर्गवाढीमुळे सरकारने ७ जानेवारीला आदेश काढून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यातील प्रत्यक्ष वर्ग बंद करण्यात आले होते. मात्र करोनाचा संसर्ग कमी होत असताना तसेच करोनाचा प्रादुर्भाव सर्वच ठिकाणी सारखा नसल्याने कमी प्रादुर्भाव असलेल्या भागातील महाविद्यालये सुरू करण्याची मागणी होत होती. विद्यार्थी, पालक आणि लोकांच्या मागणीचा विचार करून राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्यात आल्या. त्याच पद्धतीने आता महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. करोना परिस्थिती पाहून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत त्यांनाच वर्गात प्रवेश मिळणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात तर त्यानंतरच्या परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra colleges to reopen on february 1 zws
First published on: 26-01-2022 at 02:32 IST