लेखकाचे मोठेपण त्याच्या लिखाणातील आशयातून मोजायचे की लिखाणाच्या संख्येतून या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार वेगवेगळे येऊ शकते. पण गीता मेहता यांच्यासारख्या लेखिकेच्या आयुष्याची गोळाबेरीज मांडायची तर त्यांनी मांडलेला आशयच महत्त्वाचा ठरतो. गीता मेहता फक्त लेखिका नव्हत्या तर त्याआधी पत्रकार होत्या. १९७१ चे बांगलादेशमुक्तीचे युद्ध पत्रकार या नात्याने त्यांनी कव्हर केले होते. या युद्धावर बीबीसी आणि अमेरिकन नॅशनल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी त्यांनी केलेला ‘डेटलाइन बांगलादेश’ हा लघुपट विशेष गाजला होता. त्या काळात तो भारतात तसेच परदेशात सिनेमागृहांमध्ये सिनेमा सुरू व्हायच्या आधी आवर्जून दाखवला जात असे. त्याव्यतिरिक्त युरोपीयन तसेच अमेरिकी टीव्ही वाहिन्यांसाठी त्यांनी अनेक लघुपट केले. त्यांनी ‘फक्त’ पाच पुस्तके लिहिली होती. पण त्यांची पुस्तके जगभरातल्या तब्बल २१ भाषांमध्ये अनुवादित झाली. युरोपात ही पुस्तके त्या काळात बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत असत. भारतीय वंशाच्या अमेरिकी लेखिका अशी त्यांची लेखनाच्या प्रांतामधली मुशाफिरी असली तरी प्रामुख्याने भारताची पाश्चात्त्य जगाला ओळख करून देणे या लेखकीय भूमिकेतून आयुष्यभर वावरल्या आणि ८० व्या वर्षी हे सगळे थांबले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गीता मेहता यांचा जन्म १९४३ चा. एखादा लेखक कुठल्या पातळीवरून जग बघतो, त्यावरून त्याचे अनुभवविश्वही प्रतिबिंबित होते. जन्म एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या घरातला. ओदिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या त्या कन्या आणि नवीन पटनाईक हे त्यांचे बंधू. ज्येष्ठ संपादक आणि प्रकाशक सोनी मेहता यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या आणि मग भारत-अमेरिका असे त्यांचे सतत दौरे सुरू झाले. लंडन, न्यूयॉर्क आणि भारत असे तिन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असे. २०१९ च्या निवडणुकांआधी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी तो नाकारला कारण निवडणुकांआधी जाहीर केला गेलेला पुरस्कार घेतला तर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो अशी त्यांची भूमिका होती. त्यांची तीक्ष्ण विनोदबुद्धी, भारतातील स्थानिक विणकरांच्या जगताबाबतचे त्यांचे ज्ञान व आकलन विलक्षण होते. ‘अ रिव्हर सूत्रा’ या पुस्तकासाठी मिळालेले लाखो रुपयांचे मानधन त्यांनी बिहारमधल्या विणकर स्त्रियांना सावकाराच्या वेठबिगारीतून सोडवण्यासाठी देऊन टाकले होते.

‘कर्मा कोला’, ‘राज’, ‘अ रिव्हर सूत्रा’, ‘स्नेक्स अॅण्ड लॅडर्स’, ‘इटरनल गणेशा- फ्रॉम बर्थ टू रिबर्थ’ ही त्यांची पाच पुस्तके. ‘कर्मा कोला’ हे त्यांचे पहिले पुस्तक भारतात जाऊन एखादा गुरू शोधून आपल्याला ताबडतोब मोक्ष मिळेल अशी धारणा असणाऱ्या पाश्चात्त्यांवर भाष्य करते. ‘राज’ या कादंबरीत दोन राजकन्यांवर भाष्य होते. ‘अ रिव्हर सूत्रा’मध्ये त्यांनी पाश्चात्त्य समाजाला भारतातील आधुनिक जीवनाची ओळख करून दिली होती. तर ‘स्नेक्स अॅण्ड लॅडर्स’मध्ये भारताच्या ५० व्या स्वातंत्र्योत्सवाच्या निमित्ताने भारतातील जग पाश्चात्त्यांना उलगडून दाखवले होते. ‘पब्लिशर्स वीकली’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की मला पाश्चात्त्यांना आधुनिक भारत कसा आहे, ते दाखवायचे होते आणि आपल्या जन्माच्या २५ वर्षे आधी देशात काय झाले ते इथल्या तरुण पिढीला सांगायचे होते. त्यांच्या लेखनाला युरोपात मिळालेला प्रतिसाद पाहता पाच पुस्तकांमधूनही त्यांनी त्यांचे काम अचूक आणि नेमके केलेय असेच म्हणता येईल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geeta mehta dateline bangladesh american tv channels short film amy