अधिकृत सरकारी निवासस्थान नाकारून आपल्याच घरी राहण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतल्याने त्यांच्या इमारतीलगत दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.
केजरीवाल यांना पाहायला आणि भेटायला दररोज हजारो लोक येत आहेत. केजरीवालही आवारात येऊन रोज सकाळी त्यांच्याशी बोलत असतात. या ‘जनता दरबारा’मुळे वाहतूक तसेच सुरक्षेचा प्रश्नही उद्भवत असून त्यासाठीच दोन राज्यांच्या पोलिसांनी कामाच्या जबाबदारीची विभागणी केली आहे.
केजरीवाल यांच्या इमारतीच्या परिसरातील वाहतुकीच्या नियमनाची जबाबदारी उत्तर प्रदेश पोलीस पार पाडत असून इमारतीच्या आवारात साध्या वेषातील पोलीस तैनात आहेत. कोणतीही अनुचित घटना उद्भवू नये, याची काळजी ते घेत आहेत. इमारतीच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्र बसविण्यात आले आहे.
नाराजीनामा
सत्ता स्वीकारून पक्ष आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेला आहे, असा आरोप करीत आम आदमी पक्षाचे मध्य प्रदेशातील माजी प्रवक्ते कमल श्रीवास्तव यांनी रविवारी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपला पक्ष हा राजकारणातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी जन्माला आला आहे. भ्रष्ट पक्षाबरोबर सरकार स्थापण्यासाठी नव्हे, असेही त्यांनी नमूद केले.
वडिलांकडून होमहवन
केजरीवाल यांचे वडील गोविंद राम केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपुत्राला जनतेला दिलेली आश्वासने पाळता येवोत, यासाठी कौसंबी मंदिरात रविवारी हवन केले. आप सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सप नेत्याची भेट
समाजवादी पक्षातून निलंबित केलेले नेते कमाल फारुकी यांनीही केजरीवाल यांची रविवारी भेट घेतली. आपण आम आदमी पक्षात प्रवेश करणार का, असे पत्रकारांनी विचारता ते म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी केजरीवाल यांचे अभिनंदन करायला आलो आहे. या पक्षात प्रवेश करायची प्रत्येकाचीच इच्छा आहे. अर्थात माझा निर्णय मी सोमवारी जाहीर करीन, असे त्यांनी सांगितले.यासिन भटकळ हा मुसलमान असल्यामुळेच पकडला गेला, असे विधान फारुकी यांनी केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांना समाजवादी पक्षाच्या सरचिटणीस पदावरून काढण्यात आले आणि नंतर पक्षातूनही निलंबित करण्यात आले होते.
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी फारुकी पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याच्या माहितीस दुजोरा दिला. सर्वच पक्षात अनेक चांगले नेते आहेत. त्यांनी आमच्या पक्षात यावे, असेही सिंग म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या नेत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे अन्य पक्षाच्या नेत्यांना आम्ही आवाहन करीत आहोत, असेही ते म्हणाले.

सात ते दहा दिवसांत व्यवस्था मार्गी लावणार
गाझियाबाद: व्यवस्था सुधारण्यासाठी आणखी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागेल, त्यानंतर दिल्लीकरांचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. पदभार स्वीकारल्यानंतर विविध समस्या घेऊन नागरिकांनी त्यांच्या येथील निवासस्थानी गर्दी केली केली होती. आपण खोटी आश्वासने देणार नाही, त्यामुळे व्यवस्था मार्गी लागल्यावर निवेदने स्वीकारू, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. सामान्य माणूस हा आपल्या धोरणाच्या केंद्रस्थानी असेल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. लोकांच्या पाठिंब्याशिवाय काम करणे अशक्य असल्याची कबुली त्यांनी दिली. आम्ही आताच सत्ता हाती घेतली आहे, प्रश्न समजावून घेण्यासाठी काही वेळ लागेल, असे त्यांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना दिले. दिल्ली परिवहनचे १४  हजार चालक आणि वाहक अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केजरीवाल यांच्याकडे केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi uttar pradesh police will jointly manage flow of visitors to kejriwals house