देशभरात करोना महमारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे, शिवाय करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासात देशात ३ लाख ३३ हजार ५३३ नवीन करोनाबाधित आढळून आले, ही संख्या कालच्या तुलनेत ४ हजार १७१ रूग्णांनी कमी आहे. तर,५२५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. याशिवाय मागील २४ तासात २ लाख ५९ हजार १६८ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या २१ लाख ८७ हजार २०५ आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १७.७८ टक्के आहे. कोणत्याही देशातून भारतात येणाऱ्या ज्या प्रवाशांची करोना चाचणी पॉझिटिव्ह येईल, त्यांना विलगीकरण केंद्रात राहणे अनिवार्य राहणार नसून, नव्या निकषांनुसार त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच, विदेशातील ज्या प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, त्यांची भारतातील चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना सात दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहावे लागेल आणि भारतात आल्यापासून आठव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी लागेल, असे गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.