जम्मू काश्मीरातील परिस्थितीवरून काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. राहुल गांधी यांनी काश्मीर दौऱ्यासाठी काही अटी टाकल्या होत्या. पण त्यांची पूर्तता करणे अशक्य असल्याचे राज्यपाल मलिक यांनी कळविले होते. त्यावर विनाअट काश्मीर खोऱ्यात येण्यास तयार आहे, कधी येऊ सांगा अशी विचारणाच आता राहुल गांधी यांनी राज्यपालांकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अहवालांचा हवाला देऊन केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. राहुल एक जबाबदार नेते आहेत. त्यांच्यासाठी विमान पाठवतो, त्यांनी काश्मीरात येऊन पाहावे आणि मग बोलावे, असे आवाहन मलिक यांनी केले होते.

मलिक यांच्या आवाहनाला राहुल गांधी यांनी लगेच ट्विटरवरून प्रतिसाद दिला. विमानाची गरज नाही. विरोधीपक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळासह मी काश्मीरात येईल. पण, स्थानिक नागरिक, नेते, लष्कराचे जवान यांच्याशी मुक्तपणे बोलण्याची हमी द्या, असे राहुल म्हणाले होते. यासंदर्भात मलिक यांनी प्रशासनाकडे विचारणा केली होती. राहुल गांधी यांनी टाकलेल्या अटींची पूर्तता करणे अशक्य असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. तसे राज्यपालांनी राहुल गांधी यांना कळविले.

राज्यपाल मलिक यांनी दिलेल्या उत्तरानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अटी मागे घेतल्या आहेत. यासंदर्भात राहुल यांनी पुन्हा ट्विट केले आहे. ते म्हणाले, आदरणीय मलिकजी, माझ्या ट्विटला तुम्ही दिलेला दुबळा प्रतिसाद बघितला. आता माझी कोणतीही अट नाही. जम्मू काश्मीरचा दौरा करण्याचे आणि काश्मीरी लोकांना भेटण्याचे आपले आमंत्रण मी स्वीकारत आहे. कधी येऊ सांगा? असे राहुल म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्यपाल मलिक काय निर्णय घेणार याची प्रतिक्षा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul reply to malik no conditions for jammu kashmir tour when can i come bmh