बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबतच्या तक्रारींची दखल अखेर एसटी महामंडळाने घेतली असून १५ मे ते १५ जून दरम्यान विशेष अभियानाद्वारे सर्व एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहांची विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे.
बसस्थानके व आगारांमधील स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी काही खासगी संस्थांना ‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावर कंत्राटे देण्यात आली होती. तरीही या स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय असल्याचे आढळून आले आहे. मुंबईसह राज्यभरातील अनेक बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे वापरण्याजोगी नसल्याने प्रवाशांना, विशेषत: महिला प्रवाशांना एसटीने लांब पल्ल्याचा प्रवास करणे नकोसे होते. स्वच्छतागृहांमधून मैला आणि पाणी बाहेर वाहत येणे, बेसिनचे नळ तुटलेले, त्यांना पाणीच नसणे, मुताऱ्यांची भांडी तुटलेली अशा तक्रारी नेहमी केल्या जातात. सातारा, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, बोरिवली आदी ठिकाणच्या स्वच्छतागृहांची देखभाल खासगी संस्थांकडे असूनही त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या तक्रारींची दखल घेऊन महामंडळाने १५ मे पासून १५ जूनपर्यंत सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे आणि तेथील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खास मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छतागृहांचा वापर करताना महिला प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घेऊन स्वच्छता आणि रंगरंगोटी याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता करताना प्रवाशांना असुविधा झाल्यास संबंधित आगार/स्थानक प्रमुखांवर तसेच संबंधित खासगी संस्था यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या विशेष स्वच्छता अभियानानंतरही बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवाशांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.