मुंबई : राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर फारसा पाऊस पडलेला नाही. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. दरम्यान, हा संपूर्ण आठवडा आकाश अंशतः ढगाळ राहील. मोसमी वाऱ्यांनी १६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग व्यापून उत्तरेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
सध्या हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. तसेच ‘ला-निना’चा परिणाम असल्याने यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्यासाठी हवामान अनुकूल आहे.
महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी राहिल्यास सोमवारपासून पुढे चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल. सध्या ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, तेथेही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पावसाचा अंदाज कुठे
मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक
अतिमुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी, रायगड,सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा
गडगडाटासह पावसाचा अंदाज
अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर
हलक्या सरींची शक्यता
धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्या नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड , लातूर आणि धाराशिव