नागपूर : एसटी महामंडळाने २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून प्रवास भाड्यात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सुट्या पैशांचा भाव वाढला आहे. दरम्यान तिकिटाच्या सुट्या पैशावरून आता प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद वाढण्याची शंकासह इतरही अनेक मुद्दे विविध कामगार संघटनानी उपस्थित केले आहे. नवीन परिवहन मंत्री विकासक असून त्यांनाही श्रीरंग बरगे यांनी लक्ष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटीची नवीन भाडेवाढ ही सम प्रमाणात व्हायला हवी होती. पण ती विषम प्रमाणात झाल्यामुळे एक, दोन रुपयांची वाढ तिकीट दरात झाली आहे. एसटीचे बहुतांश प्रवासी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ऑनलाईन पैशाचा व्यवहार करायला अडचणी येतात. त्यामुळे सुट्या पैशावरून वाहक व प्रवासी यांच्यात खटके उडण्याची शक्यता आहे.

नव्या दरा प्रमाणे पूर्ण तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१ आणि अर्धे तिकीट ६,११, १६, २१, २६ ते इतर असे झाले आहे. पूर्वी भाडे पाच रुपयांच्या पटीत होते ते नवीन भाडेवाढीमध्ये एक रुपयांच्या पटीत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना अतिरिक्त एक रुपया खिशात ठेवावा लागणार आहे. प्रवाशांनी १०, १५, २५, ५० रुपये दिल्यानंतर प्रवाशांकडे एक रुपया नसल्यास वाहक आणि प्रवाशांमध्ये एक रुपयासाठी खटके उडण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तिकीट दरात तात्काळ बदल करण्यात यावा अन्यथा कंडक्टरच्या डोक्याला कटकट होणार आहे. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांच्या काळात सम प्रमाणाच्या पटीत भाडेवाढ केली होती. त्यामुळे कुठेही वाद होताना दिसले नाहीत. रावते हे सामाजिक कार्यकर्ते असल्याने चालक वाहक व सर्व कर्मचारी यांच्याशी बोलून स्वतः दररोज लक्ष ठेऊन काम करायचे. मात्र नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः विकासक असल्याने यांना फक्त जागा कशा विकसित करायच्या एव्हढेच ठाऊक आहे. त्यामुळे एवढंच म्हणता येईल की, जे रावते यांना कळलं ते प्रताप सरनाईक यांना कळलं नाही. अर्थात सरनाईक यांची सुरुवात आहे, त्यांनीही एसटीला समजून स्वतः प्रत्येक विषयाची माहिती घेऊन दररोज लक्ष घालून काम करण्याची गरज असल्याचे बरगे म्हणाले.

हे केल्यास वाद टाळणे शक्य…

मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८(२) तरतुदी नुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. त्यांच्याकडे १४.९५ टक्के इतकी वाढ करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आला होता. पण त्याला मंजुरी देताना सम प्रमाणात भाडेवाढ करण्याऐवजी विषम प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे. तरी या संदर्भात प्राधिकरणाची पुन्हा एकदा बैठक घेऊन दुरुस्ती करून सम प्रमाणात भाडेवाढ केल्यास तंटे होणार नसल्याचे बरगे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St corporation increased travel fare from january 24 midnight price of free money has increased mnb 82 sud 02