– डॉ. क्षितिजा कुलकर्णी

‘सद्गुरु वाचून सापडेल सोय’ या लेखात मनोविकार तज्ञ डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी डोळसपणे आणि विज्ञानवादी दृष्टिकोनातून छदमविज्ञान, आधुनिक विज्ञान, तसेच सद्यस्थितीवर अतिशय चपखलपणे भाष्य केले आहे. भौतिक जगात जगताना पृथक्करण अधिष्ठित (analytical), गंभीर सखोल (critical thinking) विचार शैली दर्शन होते.

लेख एकांगी होऊ नये, तसेच लेखकाचा योगाभ्यास, पर्यावरणाचा, सामाजिक मनस्थितीचा अभ्यास (सद्गुरुंचे कार्यक्षेत्र) किती खोल आहे याची मला कल्पना नसल्यामुळे, या विषयासंदर्भात इतर दृष्टिकोन वाचकांच्या निदर्शनास यावेत यासाठी हा लेख प्रपंच. प्रथम लेखकाने येथे मांडलेल्या मुख्य मुद्द्यांचा परामर्श घेऊ.

लेखनाची भाषाशैली अतिशय सौम्य असली तरी त्यामागून प्रकट होणारे काही परखड प्रश्न, जे जनसामान्यांना नक्कीच पडू शकतात, ते मी मांडते.

१. शेवटी आधुनिक उपचार पद्धती लागलीच ना! एवढी ध्यानधारणा करायला शिकवता, त्याचा काय उपयोग झाला? आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब न करता, फक्त ध्यानधारणेवरच अवलंबून राहिले पाहिजे होते.

– सद्गुरूंनी आत्तापर्यंत कधीही आधुनिक उपचार पद्धतीला गौण मानलेले नाही. त्याचे महत्त्व आणि उपयुक्तता यांचा ते निश्चितच सन्मान करतात. तसेच यावेळी मीडियामुळे मेंदूतील रक्तस्त्राव आणि शस्त्रक्रिया खूपच सार्वजनिक चर्चेमध्ये आले. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये, कधीही आधुनिक उपचार पद्धतीवर अवलंबू नये असे सांगितले नाही. उलट गरज असेल तेव्हा प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या हेच सांगितले जाते. आताही ऑपरेशन लवकर करायला हवे होते का, हे म्हणणे रास्त आहे. कधीही गुंतागुंत नको, या विचारातून लवकर उपचार घ्यावा हे योग्य आणि कमी धोक्याचे आहे. कोणत्याही सर्जरीसाठी योग्य वेळ निवडावी लागते. त्याआधी काही वेळा औषधोपचार किंवा बारकाईने निरीक्षण (क्लोज मॉनिटरिंग) केले जाते. सेल्फ रिझोल्यूशन किंवा कन्झर्वेटिव ॲप्रोच घेतला जातो. या सर्वाचे प्रोटोकॉल असतात. परंतु याविषयी नेमकी माहिती उपचार करणाऱ्या सर्जनना असेल. फक्त उपचार घेऊन आराम करून स्वांतसुखाय बरे होणे हे उद्दिष्ट येथे नव्हते. महत्त्वाचे कार्यक्रम, सामाजिक बांधिलकी, हाती घेतलेल्या योजना, दिलेली वचने, हाताळल्या जाणारे विषयाचे महत्त्व आणि सहभागी लोक यांचा विचार केला गेला. अर्थातच यासाठी गरजेची असणारी शारीरिक आणि मानसिक जोखीम त्यांनी उचलली होती. ते दाखल झाले नाहीत म्हणजे शस्त्रक्रिया नाकारली हा लेखकाने काढलेला अर्थ आहे. आपल्या कामाला वेळ येईपर्यंत धोका पत्करून त्यांनी प्रामाणिक, सच्चे, वाहून दिले. साधी माणसं पहिल्यांदा मला आराम करू दे, काम बघू पुढे ढकलू, माझा जीव महत्वाचा असेच करणार. एखादा योद्धा, ज्याच्या जीवापेक्षा काही लक्ष्य वेगळे आहे, त्याची पद्धत ही वेगळी असणार.

हेही वाचा – लेख : आमच्या उत्तराधिकाऱ्यांपुढचा काळ अधिक कठीण!

ध्यानधारणा, योगासने, अष्टांग योग ही निरोगी आयुष्य जगण्याचे एक साधन आहे. याला आपण इंडिजिनस टेक्नोलॉजी म्हणू शकतो. योगशास्त्र ही निरोगी शरीर, मन एकाग्र, भावना शांत आणि क्रयशक्ती उत्तम राहण्यासाठी अंगीकृत करण्याची एक जीवनशैली आहे. मिळणारे आरोग्य हा त्याचा परिपाक आहे. अर्थातच, अनुवांशिक आजार, जंतू संसर्ग, अपघात, त्यामुळे होणाऱ्या व्याधी अथवा व्यंग यांच्याविरुद्धची ही हमी नाही. उत्तम जीवनशैली असणारे शरीर नक्कीच अशा व्याधीतून लवकर आणि चांगले बरे होते. यातीलच क्रियायोग या योगप्रकाराचे ते अभ्यासक, साधक, प्रचारक, शिक्षक, संस्थाचालक असे आपण त्यांना ओळखू शकतो. क्रियायोग हा करून पडताळण्याचा प्रकार आहे. त्याचा अनुभव वाचून, बोलून, लिहून येणार नाही.
त्यांना इतके अनुयायी असतील, तर त्यांनी नक्कीच ते करून पाहिले असणार. त्यांच्यासाठी ते परिणामकारक असेल. ते नुसते लेख लिहून कसे कळणार, करून नक्की लिहिले पाहिजे. योगाच्या माध्यमातून, आवेगपूर्ण (impulsive behaviour) वर्तनाकडून जागरूक (conscious) विचार व कार्यपद्धतीकडे प्रत्येकाने वळावे म्हणजेच सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य मिळेल यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

२. ते इंग्रजी भाषा, आधुनिक विज्ञानातील शब्द पेरून चुकीची व अवैज्ञानिक माहिती सांगतात.

–  त्यांचे औपचारिक शिक्षण काय? विज्ञानातील शब्द फक्त विज्ञान विषयातील विद्यार्थीच वापरू शकतात असा सर्वव्यापी समज दिसतो. त्यांचे औपचारिक शिक्षण म्हणजे म्हैसूर युनिव्हर्सिटी येथून बीए इंग्लिश आहे. आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जगातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषा हे उत्तम माध्यम आहे. त्यांचे खरे वैशिष्ट्य क्रियायोग, हठयोग ही आहे. त्यांचे कामाचे क्षेत्र हेल्थ ॲण्ड वेलनेस, आध्यात्म असे आहे. सायकोसोमॅटिक आजारामुळे काही आजारांच्या नावांचा नक्कीच उल्लेख होत असेल पण याचा अर्थ ते याचा इलाज करतात असा होत नाही. आजार, आधुनिक उपचार पद्धती, मनोविकार हे त्यांचे क्षेत्र नाही. मनःशांती, समाधी, संयम अवस्था हे नक्कीच त्यांच्याकडून उत्तम समजावले व शिकवले जाते. अजून तरी स्पिरिच्युअल मेडिसीनचे शिक्षण औपचारिकरित्या भारतात उपलब्ध नाही. पण ते लवकरच एम्सला उपलब्ध होत आहे.

ते स्वतः अनुभवाधारित शिक्षणा (experiential learning) वर भर देतात. त्यांचे कोर्सेस देखील त्यावर आधारित आहेत. अभ्यासक्रम अधिष्ठित, पाठ्यपुस्तके, लेखी परीक्षा असे याचे स्वरूप नाही. जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याचे ते एक शिक्षण आहे. त्यांचं लेखन, कविता हे अनेक पुस्तके मासिके या स्वरूपात उपलब्ध आहे. तसेच आश्रम देखील खुला आहे.

भक्ती मार्गातील संत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, कबीर, तुलसीदास, गालिब, नामदेव महाराज, गुरू गोविंद सिंह यांचे शिक्षण आपण विचारतो का?

३. आपण सांगत असलेल्या ज्ञान पद्धतीने २४०% पेशींचे पुनर्निर्माण होते

– हा २४०% पेशींच्या पुनर्निर्माणाचा संदर्भ मला माहिती नाही.

४. ध्यानधारणा ते सांगतात त्या पद्धतीने केल्यास शरीर स्वतःला बरे करते. डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत नाही.

– अशा उल्लेखांचा संदर्भ नक्की द्यावा. ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे या उक्तीप्रमाणे रोजची योगसाधना आणि ध्यानधारणा डॉक्टरला दूर ठेवू शकते, असे आपण नक्की म्हणू शकतो.

५. सद्गुरु सर्वज्ञानी असल्याचा आव आणतात.

– ते प्रत्येक गोष्टीवर विचार मांडतात, व्यक्त होतात ही एक चांगली बाब म्हणून पाहायला हवी. आणि लोकशाहीमध्ये ही एक सामान्य गोष्ट असायला हवी. कुठलाही विषय वर्ज्य नसणे हेसुद्धा एक प्रकारे मोठेपणाचे द्योतक आहे. गांधीजी, आंबेडकर वगैरे मंडळींनीसुद्धा  वेगवेगळ्या विषयांवर मते मांडली आहेत आणि असे करणे सर्वांना तेव्हा मान्यही होते.

६. त्यांच्या अनुयायांवर येणारे संकट त्यांनी झेलले !

– असे कुठल्या अनुयायाने कधी म्हणल्याचे ऐकिवात नाही. कोणीतरी विनोदाने म्हणाले असेल किंवा कदाचित पुलंच्या ‘काय म्हणाले गुरुदेव’ची येथे काहीतरी गल्लत झाली असेल.

७. सर्वानाच एका तराजूत तोलण्याची गडबड लेखकांनी केल्याचे जाणवते.

– सद्गुरूंचे नाव बाबा रामरहीम, बाबा रामदेव, आसाराम बापू यांच्या बरोबर घेणे सयुक्तिक वाटत नाहीत. विविध क्षेत्रातील काम, लेखन, कावेरी कॉलिंग, सेव्ह सॉइलसारखे प्रकल्प प्रत्यक्षात पाहून लेखाचे प्रयोजन केले असते तर चांगले झाले असते.

संत महात्मे, समाजसुधारक, विचारवंत, क्रांतिकारक या सर्वांची कामे वेगवेगळी असतात. स्वामी रामानंद तीर्थ, विनोबा भावे, अरविंद घोष, विवेकानंद, सुभाष पालेकर गुरुजी, बाबा आमटे अशा अनेक समाजसुधारकांच्या पंक्तीत त्यांना नक्कीच बसवता येईल. मुळात ते एक विचारवंत, लेखक, कवी, योगी आहेत. परंतु सध्या ते लोकसमर्पित आयुष्य जगतात. पर्यावरण कार्यकर्ते, आध्यात्मिक गुरु, उत्तम व्यावसायिक, संघटनाबांधणीचे कौशल्य असलेले, सामाजिक क्रांतीसाठी झटणारे असे नक्कीच म्हणता येईल. कदाचित पारंपरिक समजुतीप्रमाणे गुरू म्हणजे ठरावीक कपडे, ठरावीक विषय, ठरावीक शैली, भाषा, सांत्वनात्मक शब्द समाजाला अपेक्षित दिसतात. त्या चौकटीत बसले नाही की संपले. त्यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य देखील उल्लेखनीय आणि हटके आहे. शिक्षणदेखील आधुनिक आणि भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, मार्शल आर्ट, नेतृत्वगुण विकसन यातून एक आयुष्य तयार करणारे आहे. नोकरी मिळवण्यासाठी डिग्री /उपाधी देणारे नाही.

भौतिक जग आणि आध्यात्मिक जग या आयुष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्यांची उद्दिष्टे पूर्णतः भिन्न आहेत. बहुतांशी आध्यत्मिक गुरूंचा आर्थिक भागांक (फायनान्शिअल कोशंट) कमी असतो. परंतु, श्री जग्गी वासुदेव यांना आपण भौतिक जगात चांगल्या मार्गाने उत्तम पाय रोवून, आध्यत्मिक जगाची सफर घडवणारे एकमेव आधुनिक गुरू म्हणू शकतो. त्यामुळेच उच्च शिक्षित लोकसुद्धा त्यांचे अनुयायी होत असतील.

सद्गुरु वाचून सापडेना सोय
धरावे ते पाय आधी आधी.
तुका म्हणे कैसे आंधळे हे ज्ञान
गेले विसरून खऱ्या देवा…

यामध्ये आंधळ्या ज्ञानाच्या आवेगात खऱ्या देवाला विसरण्याची चूक केली तशी आपण एका चांगल्या गुरूंना हिणवण्याची चूक होऊ देऊ नये.
शिवाजी महाराज, रामदास स्वामी, विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, उधमसिंग, महात्मा गांधी आणि अशी अनेक स्वार्थविरहित व्यक्तिमत्वे पाहिली असता त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट ध्यानात येते. तसेच सद्गुरूंच्या आयुष्याचे उद्दिष्ट आपण समजून घेतले पाहिजे.

सर्वप्रथम आपण आरोग्याची व्याख्या तपासून पाहू.

It is not merely the absence of the disease but a state of physical, mental, social and spiritual well-being. (WHO)

गेल्या दोनशे वर्षात आधुनिकोपचार पद्धतीमुळे शरीराच्या आरोग्याबाबत जागरूकता चांगली आहे. भारतात देखील सध्या जिम, योगा, स्पोर्ट्स याकडे चांगले लक्ष दिले जाते. मानसिक आरोग्याबाबतसुद्धा लोक जास्त जागरूक झाले आहेत. गरज पडल्यास स्वतःहून मानसोपचारतज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बुद्ध्यांक, भावनांक हे शब्द प्रचलित झाले आहे. परंतु -सामाजिक आणि  आध्यात्मिक आरोग्याचे काय?

आपला आध्यात्मिक भागांक किती जणांनी तपासला आहे?

सामाजिक भागांक कसा आहे? सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता, एका पिढीकडून निर्माण होणारी पुढची सक्षम, निरोगी, आनंदी, समाधानी, औषधोपचाराशिवाय किंवा व्यसनाधीनतेशिवाय जगणारी अशी निर्माण होईल काय?

मानसिक असंतुलनासाठी, आजारांसाठी मनोचिकित्सक, मानसोपचार तज्ञ यांच्याकडून उपचार घेऊन  किती रुग्णांना मानसिक समाधान लाभते? ते आनंदी आयुष्य जगतात का? त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे गोळ्यांच्या स्वरूपात देता येतात का?

गेल्या शेकडो वर्षातील भारतामधील आक्रमणे, ढळत जाणारी सामाजिक परिस्थिती, गरिबी, शिक्षणाचा अभाव, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, राजनैतिक आस्थिरता, निसर्गाचा ऱ्हास, प्रदूषण, वाढत जाणारे औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण, माध्यमे, गॅजेट्स या सर्वांचा समाज मनावर आणि व्यक्ती विचारावर परिणाम होतो.

पारंपारिक विचार पद्धती, काळानुरूप बदल न करण्याचे वृत्ती, जाती, पंथ, पद्धती, प्रथा यांना घट्ट बांधून राहण्याची सवय हेही महत्वाचे आहे.

निरोगी जीवन शैलीचे आचरण न करता, मनस्वी वागून, नंतर जसे आधुनिक उपचार पद्धतीकडून ताबडतोबीचे उपाय हवे असतात, तसे भौतिक जगातील गरजा सोप्या, विनाकष्टाने मिळवण्यासाठी अंधश्रद्धा, अपमार्ग अवलंबिला जातो. बऱ्याचदा योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन नक्कीच महत्त्वाचे आहे. त्यामागील मानसिक आजारांचे निराकरण देखील महत्त्वाचे आहे. समजा, कायद्यामध्ये दुरुस्ती करून हे थांबवले गेले तरी स्वागतार्ह आहे. परंतु ज्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लोक या अपमार्गाकडे वळतात, तुमची उत्तरे देणे आधुनिक उपचार पद्धतीला शक्य आहे का?
यासाठी प्रत्येकाचा आध्यात्मिक भागांक विकसित करणे महत्त्वाचे आहे. मनोविकारांचे उपचार घेतले तरी, कोणत्या मार्गाने मनातील भीती, द्वेष, राग लोभ, मत्सर, गोंधळ, असुरक्षितता जाऊन वैश्विक प्रेमाचे भावना, करुणा, समाधान, शांतता, एकरूपता निर्माण होईल हे पाहिले पाहिजे.

माणसाच्या मरणाची शाश्वतता गांभीर्याने लक्षात घेऊन, आयुष्याची ध्येय निश्चिती करता आली पाहिजे. जेणेकरून लाक्षणिक सुखासाठी, पीअर प्रेशरमुळे, आवेगाने, चुकीच्या मार्गाला न लागता, जागरूकपणे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय जबाबदारीने स्वतःला घेता आले पाहिजेत.
पूर्वी प्रत्येक कुटुंबाला त्यांचे गुरु असत. औपचारिक शिक्षणाला जसे शिक्षक असतात, तसेच आयुष्याला कसे सामोरे जावे याचे ते ज्ञान देत. गेल्या शेकडो वर्षांच्या परकीय आक्रमणाच्या काळात उत्तम गुरूंकडून उत्तम शिष्य तयार होण्याची परंपरा खंडित झाली. भौतिक सुखाच्या ओढीपोटी कर्मकांड, बाजारीकरण, भीतीमधून निर्माण होणाऱ्या रूढी, परंपरा तयार झाल्या. अभ्यासपूर्वक एखादी गोष्ट अंगी करण्याची वृत्ती लोप पावत गेली. कोणतेही कर्मकांड करण्यापेक्षा, चांगला आध्यत्मिक, वैज्ञानिक, तार्किक दृष्टिकोन तयार झाल्यास माणसाचे माणसाशी, पशू पक्षांशी, निसर्गाशी, ब्रम्हांडाशी नक्कीच एकात्मतेचे नाते निर्माण होईल. यासाठीच सद्गुरु प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा – राम नाईक : नव्वदीतला लोकसेवक

या लेखाचा उद्देश इशा फाउंडेशन किंवा सद्गुरूंचे समर्थन करणे असा नसून, मला समजलेले सद्गुरू व त्यांसारखे इतर काही लोक व संस्था यांबद्दल गैरसमज दूर करणे हा आहे. समाजमनाच्या स्थैर्यासाठी आयुष्याची बोली लावणारे सद्गुरू, व्यावसायिकपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा डोळस वापर केल्यामुळे कोट्यावधी लोकांपर्यंत पोचले. यामुळे योग विज्ञानाचा प्रसार, शिष्टाचारपूर्ण आणि प्रमाणित पद्धतीने ते करू शकले.
प्राचीन भारतीय तत्वज्ञानामध्ये जन्म-मृत्यु, इच्छा-आकांक्षा, जागरूकता, जीवनमुक्ती, मनुष्याचे परस्परसंबंध वगैरे अनेक गोष्टींसंदर्भात ज्ञान उपलब्ध आहे. भगवद्गीता, अद्वैत वेदांत, अनेक ऋषींची उपनिषदे , योगासूत्रे, संत साहित्य, बुद्धांचे तत्वज्ञान यामध्ये हे ज्ञान उपलब्ध आहे. अपरिचित किंवा अवघड भाषा यामुळे हे सामान्यांना सहजपणे उपलब्ध नाही. आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्यांना वेळ काढून ते ज्ञान मिळवणे देखील अवघड आहे. सद्गुरूंसारख्या व्यक्ती हे ज्ञान यूट्यूब, चर्चासत्रे, छोटे अभ्यासक्रम यासारख्या नवीन मार्गाने नवीन पिढीसाठी उपलब्ध करत आहेत. याकडे दुर्लक्ष करू शकता. किंवा याचा अभ्यास करून चर्चा करून अनुकूल केव्हा प्रतिकूल मते बनवून काही आचरणात आणू शकता तर काही आपल्या आचरणामध्ये चुका होत असतील तर त्या सुधारू शकता.

drkshitijakulkarni@gmail.com