बरे झाले, सोनारानेच कान टोचले ते. आम्ही सांगत होतो, तर वेडय़ात काढत होते सगळे. आता बसा बोंबलत. कल्याण-डोंबिवलीत अधिकृत घरांना बंदीच घातली अखेर न्यायालयाने. आम्ही बाबा अनधिकृत बांधकामवाले, भूमाफिया. अहो, काय काय दूषणं लावतात आम्हाला. असा काय गुन्हा केलाय हो आम्ही? रीतसर चाळीच बांधतो ना आम्ही आमच्या जमिनीवर. गोरगरिबांना आसरा तर मिळतो त्यात. नाही तर आता गरीब माणसाला अधिकृत घर परवडणार आहे का? अहो, त्याचा पगार तो काय? त्यात तो खाणार काय आणि बँकेचा हप्ता देणार काय? हातावरचं पोट असणारी माणसं पंचवीस-तीस लाखांची घरं कशी काय घेतील? ती आपली चाळीतच दीड खणीची खोली शोधणार. तीन-पाच लाखांत. तेही पैसे ते बिचारे कुठून तरी उभे करणार- पाहुण्यारावळय़ाकडे हात पसरून किंवा गाठीशी असलेले सोनेनाणे विकून. आला दिवस ढकलतात बिचारी. लाइटचा पत्ता नसतो. पाण्याची बोंब असते, पण काय करणार? काढतात दिवस बिचारी कशी तरी. एवढं करून पुन्हा अनधिकृततेची टांगती तलवार आहेच डोक्यावर. जसा काही फारच मोठा गुन्हा केलाय त्यांनी.
बँका यांना कर्ज देत नाही. काय तर म्हणे, ते अनधिकृत घरात राहतात. अनधिकृत घरात राहणाऱ्याने बँकेत खाते खोलले तर चालते तुम्हाला. त्याने एफडी काढली, रिकरिंगमध्ये दरमहा पैसे टाकले तर ते घेता तुम्ही.  महापालिकावाले रीतसर करही घेतात, पावतीवर अनधिकृत बांधकाम असा शिक्का मारून. तरीही पुन्हा नाक मुरडायला मोकळे. हा दुतोंडी व्यवहार झाला. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर शुद्ध दांभिकपणा आहे हा. अनधिकृत घरात राहणारे गुन्हेगार आहेत असे तुम्हाला वाटते ना? मग त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका ना तुम्ही. तुम्ही पाकीटमाराला, भुरटय़ा चोराला, फसवणूक करणाऱ्याला थारा देता का? नाही ना? मग अनधिकृत घरात राहणाऱ्याला नोकरीवर का ठेवता? त्यांच्याकडून का कामे करून घेता? तुमच्या कंपनीत काम करणारे कामगार, ज्यांना तुम्ही महिन्याकाठी जेमतेम दहा-बारा हजार रुपये पगार देता. तुमच्या घरात घरकाम करणारी मंडळी, ज्यांना तुम्ही त्याहीपेक्षा कमी पैसे देता. त्यांना सांगा ना की, उद्यापासून तुम्ही सर्वानी अधिकृत घरातच राहायचे, त्याशिवाय तुम्हाला कामावर ठेवता येणार नाही म्हणून.    
गावात २०/२५ माळ्यांचे टॉवर आले. तेवढय़ा उंचीवर फक्त हवेचीच खात्री. पाण्याची नाही. लाइट असेल तरच पाणी मिळणार. नाही तर हंडे घेऊन खालच्या टाकीतून पाणी भरण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. आता तुम्हीच सांगा गावांचा चेहरा कुणी बिघडवला, आम्ही की या टॉवरवाल्यांनी? अहो, शहर कुठे? आमची गावं कुठे? रेल्वे स्टेशनपासून रिक्षा मिळायची मारामार. काही टॉवरवाल्यांची खासगी बससेवा आहे, पण तीही ठरावीक वेळी. बाकी एकूण येण्या-जाण्याचे हालच. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे टु व्हीलर, फोर व्हीलर घेतली आहे. एवढी यातायात असूनही यांना चांगले बुकिंग आहे, कारण आता घर हे काही फक्त राहण्यासाठी नसते. त्याहीपेक्षा अधिक ते इन्व्हेस्टमेंटसाठी असते. घरात दोन पगार. पहिल्या घराचे कर्ज फिटलेले. मग काय इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी दुसरे घर घेतात. टॅक्स वाचतो. प्रॉपर्टी होते. भाडेही मिळते. त्यातून हप्ता फेडायलाही मदत होते. त्यामुळे आता शेअर मार्केटपेक्षा घरांचे मार्केट तेजीत आहे. आता या मार्केटमधून कल्याण-डोंबिवली शहरे कटाप झाली आहेत. आता जा म्हणावं पुढे अंबरनाथ-बदलापूरला. अधिकृत घरांच्या शोधात.. !
महादेव श्रीस्थानकर  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court ban on new housing projects in kalyan dombivali