दुसऱ्या पक्षात गेलेल्या ५० टक्के उमेदवारांनाच यश
निवडणुका जवळ येताच मीरा-भाईंदर महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी आपला मूळ पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेचा आधार घेतला, परंतु यातील केवळ सुमारे ५० टक्के उमेदवारच पुन्हा निवडून येऊ शकले आहेत, इतरांना मात्र मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार तसेच पक्षाकडून संधी न मिळाल्याने या निवडणुकीत ९५ पैकी तब्बल ३५ नगरसेवकांनी आपल्या मूळ पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षांचा आश्रय घेतला. यात सर्वाधिक म्हणजे २२ नगरसेवक शिवसेनेत, त्या पाठोपाठ भाजपमध्ये नऊ, काँग्रेसमध्ये तीन आणि राष्ट्रवादीत एक नगरसेवक गेला, परंतु यातील केवळ १८ नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत, उर्वरित १७ नगरसेवकांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व म्हणजेच २७ नगरसेवक पक्ष सोडून गेले. यातील १० नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आणि त्यातले केवळ पाच नगरसेवकच पुन्हा निवडून येऊ शकले, तर पाच जणांच्या नशिबी पराभव आला. जिंकणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी महापौर कॅटलीन परेरा यांचा मुख्य समावेश आहे, तर हरणाऱ्या नगरसेवकांमध्ये गिल्बर्ट मेन्डोन्सा यांचे बंधू स्टीवन मेन्डोन्सा आणि भगवती शर्मा यांचा समावेश आहे. भाजपमध्ये राष्ट्रवादीतून पाच नगरसेवक दाखल झाले आणि विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून आले आहेत. यात माजी सभागृह नेते ध्रुवकिशोर पाटील, परशुराम म्हात्रे यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी पक्ष सोडला होता. यापैकी चार शिवसेनेत आणि तीन भाजपमध्ये गेले. यातील केवळ तीन नगरसेवक पुन्हा निवडून आले. भाजपमधून प्रभात पाटील, शिवसेनेतून दिनेश नलावडे आणि शर्मिला बगाजी विजयी झाले तर हंसुकुमार पांडे, मनीषा पिसाळ, सुहास रकवी आणि राजेश वेतोसकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपमधून शिवसेनेत आलेल्या एकाचाच विजय
भाजपमधून सहा नगरसेवक बाहेर पडले होते. हे सहाच्या सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले, परंतु यापैकी मीरा रोडमधून केवळ दीप्ती भट यांनाच विजय मिळवता आला. शिवसेनेला ही जागाही केवळ नशिबानेच मिळाली. या ठिकाणी भाजपच्या उमेदवार नयना वसाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरल्यानेच भट यांना या ठिकाणी विजय सहज मिळवता आला. भाजपचे गटनेते शरद पाटील यांना एबी फॉर्म देण्यात गडबड झाल्याने पाटील यांना पक्षाची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे ऐन वेळेस त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा घेऊन भाजप उमेदवाराला आव्हान दिले होते. भाईंदर पूर्व येथील भाजपचे प्रेमनाथ पाटील यांच्या उमेदवारीवर पक्षाने शिक्कामोर्तब केले असतानाही त्यांनी आयत्या वेळी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. त्यामुळे या दोन्ही जागांबाबत राजकीय वतुर्ळात उत्सुकता लागून राहिली होती, परंतु शिवसेनेच्या पाठिंब्यावर लढत असलेल्या शरद पाटील यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले तर प्रेमनाथ पाटील यांचा १८ मतांनी पराभव झाला.
बविआला सोडचिठ्ठी दोन जणांच्या पथ्यावर
बहुजन विकास आघाडीच्या तीन नगरसेवकांपैकी राजू भाईर आणि भावना भाईर या दोन नगरसवेकांनी आघाडीला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला होता, ते दोघेही विजयी झाले. शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. दळवी लढत असलेल्या प्रभाग १७ मध्ये शिवसेनेने शहरप्रमुख प्रशांत पालांडे हे तगडे उमेदवार उभे केले होते. सेनेकडून हा प्रभाग प्रतिष्ठेचा करण्यात आला होता, मात्र दळवी यांनी पालांडे यांच्यावर सुमारे ७०० मतांनी मात केली. शिवसेनेच्या आणखी एक नगरसेविका अनीता परमार यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, परंतु त्यांचाही पराभव झाला.
२८ हजार मतदारांकडून ‘नोटा’वापर
भाईंदर : नुकत्याच पार पडलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल २८ हजार ७७८ मतदारांनी उमेदवार पसंत नसल्याने नोटा या बटनाचा वापर केला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नोटा बटणाचा वापर झाल्याने राजकीय पक्षांना आपल्या उमेदवार निवडीबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
यावेळी चार सदस्य प्रभाग पद्धती असल्याने मतदारांना चार उमेदवारांना मतदान करायचे होते. मतदानयंत्रावरील चार बटणांचा वापर त्यामुळे प्रशासनाकडून मतदारांनी चार वेळा बटण दाबण्याचे आवाहन केले जात होते, यात नोटा पर्यायाचाची समावेश होता. उमेदवार पसंत नसल्यास मतदारांनी नोटा हे बटण दाबायचे असते. अनेक ठिकाणी प्रभागात उभे करण्यात आलेल्या चार उमेदवारांपैकी सर्वच उमेदवार मतदारांना पसंत होते, असे दिसून आले नाही. त्यामुळेच यावेळी मतदारांनी मतदानयंत्रावरील नोटा बटण दाबून आपली नापसंती व्यक्त केली आहे. मीरा रोडमधील ‘२० ब’ या प्रभागात सर्वात जास्त म्हणजे १६१३ मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला आहे.