ठाणे : राज्य सरकारचा अंत्यय बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे -बोरीवली भुयारी मार्गाविरोधात शनिवारी मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रहिवाशांनी सांगितले. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनी अपेक्स पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणमध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्गसंपदा पाहून अनेकांनी या भागात गृहखरेदी केली. सुमारे १२ हजार नागरिक या भागात वास्तव्य करत आहेत. याच भागात एमएमआरडीएकडून ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे.

ठाणे शहरातून बोरीवली १५ मिनीटांत गाठण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे. परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एमएमआरडीएने या भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत. याशिवाय, हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून येथे टोल नाका ही उभारण्यात येणार आहे. त्याचा त्रास येथील गृहसंकुलतील नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

टोलनाका मुल्लाबाग बस आगाराजवळ हलवा

मार्गाच्या कामामुळे येथून डम्परद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक येथून वाहतुक करतात. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येत आहे. यामुळे येथील हरित पट्टा नष्ट होत आहे. या विरोधात येथील रहिवाशांची एमएमआरडीएसोबत एक बैठक झाली होती. ठाणे-बोरीवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. तसेच येथे छाटणी केलेल्या वृक्षांचे पूनर्रोपण संकुलाच्या आवारात करावे अशी मागणी देखील केली होती. परंतु त्यास एमएमआरडीएने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

रातोरात येथील वृक्ष छाटण्यात आल्याचा आरोपही रहिवाशांचा आहे. या भुयारी मार्गासाठी गृहसंकुला लगतच्या रस्त्यावर टोलनाका देखील उभारण्यात येणार आहे. हा टोलनाका मुल्लाबाग बस आगाराजवळ हलविण्याची मागणी देखील रहिवाशांची आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी येथील रहिवाशांनी मूक आंदोलन केले.

ठाणे बोरीवली भुयारी मार्गासंदर्भात एमएमआरडीएने नागरिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आम्ही मूक आंदोलन करीत आहोत. या नंतरही आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती रहिवासी डाॅ. लतिका भानुशाली आणि नितीन सिंग यांनी सांगितले. ठाणे-बोरीवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी आमची मागणी असल्याचेही पंकज ताम्हाणे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens protest on streets against thane borivali tunnel road asj