डोंबिवली– डोंबिवली एमआयडीसीतील नव्याने बांधण्यात येत असलेले काँक्रीटचे रस्ते दीड ते दोन फूट उंच बांधण्यात आले आहेत. या उंचवट्या बांधणीमुळे आजुबाजुच्या सोसायट्या, कंपन्या रस्त्या पासून खाली आणि रस्ते उंच झाले आहेत. या चुकीच्या रस्ते बांधणीमुळे मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोन पिंपळेश्वर हॉटेल परिसरातील ५० हून अधिक कंपन्या जलमय आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआयडीसी भागात गेल्या दीड वर्षापासून एमएमआरडीएतर्फे काँक्रीट रस्त्याची ११० कोटीची कामे सुरू आहेत. ही रस्ते बांधणी नियोजना शिवाय सुरू असल्याच्या तक्रारी एमआयडीसीतील रहिवासी, उद्योजक करत आहेत. लोकप्रतिनिधी, प्राधिकरणाच्या वरिष्ठांकडे या भागातील मंडळींनी तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील तीन जणांची रिक्षा चालकाच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, कल्याण जिल्हा न्यायालयाचा निर्णय

काँक्रीट रस्ते करताना मूळ डांबरी रस्ता दोन ते तीन फूट खाली खोदून ती भर बाहेर काढून मग काँक्रीट रस्त्यांची बांधणी करणे आवश्यक होते. ठेकेदाराने मूळ डांबरी रस्त्याचा वरचा थर काढून त्या थरावर काँक्रीट रस्त्याची बांधणी केली. या रस्ते बांधकामामुळे एमआयडीसीतील सोसायट्या, कंपन्या पावसाळ्यात पाण्याखाली जातील, अशी भीती रहिवासी, उद्योजकांनी व्यक्त केली होती.

एमआयडीसी जलमय

मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने फेज दोन मधील पिंपळेश्वर हाॅटेल भागातील ५० हून अधिक कंपन्यांच्या आवारात काँक्रीट रस्त्यांना अडलेले पावसाचे पाणी शिरले आहे. कच्चा, पक्क्या मालाची नासाडी झाली आहे. आठवड्यापासून कंपनीच्या तळाच्या भागातील पाणी कामगार, उपसा पंपाने बाहेर काढूनही कमी होत नसल्याने कंपनी चालक हैराण आहेत, अशी माहिती उद्योजक श्रीकांत जोशी यांनी दिली.

उत्पादित माल निर्यातीसाठी पाठविण्याची सज्जता ठेवली आहे. कोणीही मालवाहू ट्रक चालक कंपनी आवारातील पाण्यात वाहन घेऊन येण्यास तयार नाही. काही कंपन्यांमधील कच्चा माल संपला आहे. तो जलमय परिस्थितीमुळे बाहेरच्या राज्यातून घेऊन येण्याची नोंदणी करणे अनेक उद्योजक धाडस करत नाहीत, असे उद्योजक जोशी यांनी सांगितले.

विविध कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी परिसरात वाहते. कामगारांना विनासुरक्षा अशा पाण्यात काम करण्यास कोणी उद्योजक धजावत नाही. उंचवट्या काँक्रीट रस्त्यांमुळे कंपनी चालकांची ही बिकट परिस्थिती झाली आहे. या बिकट परिस्थितीकडे कोणीही लोकप्रतिनिधी, एमआयडीसी, एमएमआरडीए अधिकारी, ठेकेदार लक्ष देण्यास तयार नाही. कंपनी चालकांचे या जलमय परिस्थितीमुळे होणारे नुकसान आता कोण भरुन देणार, असे प्रश्न उद्योजक करत आहेत.

हेही वाचा >>> कल्याण जवळील मलंगगड रस्त्यावर खड्डे चुकविताना डंपरखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

काँक्रीट रस्ते उंच केल्याने कंपन्यांमध्ये पावसाचे, गटाराचे पाणी येईल, असा विचार करुन काही कंपनी चालकांनी उन्हाळयामध्येच कंपनीचा तळाचा भाग दोन ते तीन फूट उंच उचलला. त्या कंपनी चालकांना दिलासा मिळाला आहे.

“ एमआयडीसीतील उंचवट्या काँक्रीट रस्त्यांमुळे फेज दोन मधील अनेक कंपन्या जलमय झाल्या आहेत. मालाची नासाडी झाली आहे. यंत्रसामुग्री बंद ठेवावी लागते. कंपन्यांकडून कोट्यवधीचा रुपयांचा कर भरणा करुन उद्योजकांची ही अवस्था. काँक्रीट रस्त्यांमुळे आणि कंपनी आवारातील जलमय परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी कोणालाच वेळ नाही याची खंत वाटते.” श्रीकांत जोशी – ‘कामा’, माजी अध्यक्ष.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waterlogging in more than 50 companies in dombivli midc due to heavy rain zws