पहाटे चारपासून दुसऱ्या दिवशी पहाटे अडीचपर्यंत चालणारी अव्याहत वाहतूक, ३५ ते ४० लाख प्रवाशांची ने-आण आणि १६१८ फेऱ्या असा प्रचंड पसारा चालवणाऱ्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाडय़ांच्या ताफ्यातील १२१ गाडय़ांपैकी तब्बल २७ गाडय़ांचे आयुष्य कधीच संपले आहे. मात्र या २७ गाडय़ांपैकी एकही गाडी बाजूला करणे सध्याच्या परिस्थितीत मध्य रेल्वेला अजिबात शक्य नाही. यापैकी एक गाडी कमी केली, तरी अनेक फेऱ्या कमी होतील आणि ते रेल्वेला आणि प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे सध्या मध्य रेल्वेला नव्या गाडय़ांची प्रतीक्षा आहे. पण मध्य रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत एसी विद्युतप्रवाह परिवर्तन होत नाही, तोपर्यंत नव्या गाडय़ा ताफ्यात दाखल होणेही शक्य नसल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या १२१ गाडय़ा आहेत. यापैकी बहुतांश गाडय़ा नवीन सिमेन्स कंपनीच्या असून त्या सध्या व्यवस्थित चालू आहेत. तर उर्वरित गाडय़ांपैकी १५ गाडय़ा डीसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या, तीन गाडय़ा रेट्रोफिटेड आणि नऊ गाडय़ा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (भेल) या कंपनीच्या आहेत. मध्यंतरी डी-कपलिंग आणि रुळावरून गाडी घसरल्याच्या घटना घडल्या, त्या घटना थेट या उर्वरित २७ गाडय़ांशी संबंधित आहेत. या गाडय़ांचे आयुष्यमान २०११मध्येच संपले आहे. मात्र गाडय़ांच्या कमतरतेमुळे या गाडय़ा २०१६ पर्यंत चालवाव्याच लागणार असल्याचे रेल्वेतील काही अधिकारी सांगतात.
रेल्वे वाहतूक ही थेट प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने दर १८ महिन्यांनी या गाडय़ांना संपूर्ण दुरुस्ती व देखभालीसाठी कारखान्यात पाठवण्यात येते. तेथे या गाडय़ांची पूर्ण तपासणी होऊन मग पुन्हा या गाडय़ा रुळावर आणल्या जातात. पण सूत्रांच्या माहितीनुसार ‘भेल’ कंपनीच्या काही गाडय़ांबाबात दुरुस्तीच्या वेळीही अडचण आली होती. त्यामुळे ‘भेल’च्या गाडय़ांबाबत रेल्वेला अधिक गंभीर विचार करावा लागणार आहे.
२०१२ मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत पश्चिम रेल्वे मध्य रेल्वेला आपल्या ताफ्यातील १० गाडय़ा देणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र आतापर्यंत फक्त सातच गाडय़ा आल्याचे समजते. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेलाही याच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण तेथे विरार ते चर्चगेट या दरम्यान डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाल्याने नव्या गाडय़ा या मार्गावर धावणे सहज शक्य आहे. मध्य रेल्वेच्या बाबतीत दुर्दैवाने तसे म्हणता येत नाही.
याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना विचारले असता, आर्युमान संपलेल्या गाडय़ा धावत असल्याची गोष्ट खरी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या गाडय़ा चालवत असताना पूर्ण काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या बंबार्डियर गाडय़ा ताफ्यात आल्यानंतर या २७ गाडय़ा तातडीने काढल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railways 27 locals life has been finished