नागपूर-मुंबई रस्त्यावरील लासूर स्टेशन येथील टोलनाक्याविरोधात ११ वेळा पत्रव्यवहार करूनही कारवाईस ‘टोलवाटोलवी’ केली जात आहे, असा आरोप गंगापूर-खुलताबादचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी केला. टोल सर्वेक्षणाचे कर्मचारी व ठेकेदारांनी या बाबत हातमिळवणी करून सरकारची फसवणूक केल्याबाबत त्यांनी मुख्य अभियंता यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. रस्त्यांवर खड्डे असतानाही अधिकची टोलआकारणी सुरू असल्याने रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोलनाका बंद करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बंब यांनी दिला.
भानवाडी-लासूर स्टेशन येथे गेल्या १० वर्षांपासून टोलआकारणी होते. ए. एस. क्लब ते लासूर स्टेशनपर्यंत रस्ता चांगला असल्याने टोल आकारला जातो. लासूर स्टेशन ते वैजापूपर्यंतचा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाने दुरुस्त केल्यानंतर टोलआकारणीची रक्कम वाढविण्यात आली. तत्पूर्वी किती टोल घ्यावा व किती जमा होऊ शकतो, याचे सर्वेक्षण करण्यात आले. सध्या ए. एस. क्लब ते लासूर स्टेशन रस्ता खड्डेमय झाला आहे, तरीदेखील रस्त्यावरील वाहतुकीच्या माध्यमातून दररोज एक लाख रुपयांचा टोल वसूल केला जातो. सर्वेक्षणाच्या वेळी केवळ दररोज ३० हजार रुपये मिळतील, असा अंदाजे अहवाल सादर करण्यात आला. खोटा अहवाल देण्यासाठी कर्मचारी व ठेकेदारांनी हातमिळवणी केली. टोलनाक्यावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, जनरेटर, दिशादर्शक फलक, २४ तास वीज, कॅमेरे, नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिसांना माहिती कळविणे, अशा अटींचे पालन ठेकेदारांनी केले नाही. या अनुषंगाने ११ वेळा पत्रव्यवहार केल्यानंतरही फारसे काही घडले नाही.
रस्ता खराब असल्याचे मान्य करून त्याचे काम केले जाईल, एवढेच सांगितले जाते. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने ८ कोटी मंजूरही केले. मात्र, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काम सुरू झाले नाही. रस्त्यांची दुरुस्ती होईपर्यंत हा टोलनाका बंद करावा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा बंब यांनी पत्राद्वारे राज्य रस्ते विकास मंडळाच्या मुख्य अभियंत्यास दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No action regarding toll